
- समर्थ कृपा : विलास खानोलकर
पुण्याचे आप्पासाहेब सबनीस ब्रह्मसमंधाच्या बाधेने त्रस्त होते. त्यावर उतारा म्हणून त्यांनी केलेल्या सुरुवातीच्या उपायांचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेरचा उपाय म्हणून गाणगापूरला जाऊन दत्तसेवा करावी, असे त्यांना वाटले. ते वाटणेही साहजिकच आहे. कारण त्यांचे मन रूढीप्रिय, देव-संकल्पनेने भारलेले होते. साधक-बाधक विवेकपूर्ण विचार करण्याच्या ते पलीकडचे होते. आपल्यातील काही लोक या सर्व भाकडकथा समजतात, काही शारीरिक आजार, असेही वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देतात. पण ती समाधानकारक व गुण आणणारी नसतात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अशा प्रसंगी म्हणजे भूतबाधा-पिशाच्च समंधाच्या वेळी व्यक्तिपरत्वे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अशा दोन्ही अंगांनी विचार व्हावयास हवा, असे केल्यास अनेक प्रश्न सद्यस्थितीत सुटू शकतील.
दत्तसेवेसाठी गाणगापूरला जाण्याचा मनोदय व्यक्त करताच महाराज सबनीसास म्हणाले, “जाऊ नका, आम्ही राखरांगोळी करून टाकू.” यातून श्री स्वामींना हेही सांगावयाचे आहे की, “दत्तप्रभू आणि आपण एकच आहोत. आम्ही राखरांगोळी करू, म्हणजे त्यांना असलेल्या पिशाच्चबाधेचा त्रास अक्कलकोटातच नष्ट करण्याचे एक प्रकारे अभिवचन श्री स्वामींनी सबनीसास दिले. लीलेत सांगितल्याप्रमाणे पाच वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर पिशाच्च सबनीसास सोडून गेले. खडतर एकनिष्ठेने सेवा केल्याचे फळ सबनीसांना मिळाले. म्हणून हातची स्वामी सेवा सोडून इतरांच्या मागे लागण्यात काय अर्थ?”
सबनीसासंबंधीच्या लीलाकथेतून काय घेता येईल? काय शिकता येईल?
थोडीशीच नगण्य उपासना करून परमेश्वराकडून खूप अपेक्षा करणे चुकीचे आहे. ‘श्री स्वामी समर्थांना’ अपेक्षित असलेली उपासना जाणत्याकडून माहीत करून घ्यावयास हवी. काल सुसंगत उपासना करणे, केव्हाही सोयीचे असते. नाही तर अनेकदा ‘जखम डोक्याला बँडेज पायाला’ असे होते. अशा उपासनेतून श्रम-वेळ-पैसा वाया जातो, हाताला फारसे काही लागत नाही. तेव्हा उपासनेतही सद्सद्-विवेक शुद्ध-निर्मळ आणि सरळ आचार-विचार आणि व्यवहार अपेक्षित आहे. उपासनेत सातत्य आणि वेळ याचा सुयोग्य मेळ असावा, श्रद्धा आणि सबुरी असावी, हाच इथला अर्थबोध आहे.
स्वामी समर्थ संदेश
कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा, त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन:शांती सुद्धा तुम्हालाच, विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल..!
स्वामी दत्तमहिमा
स्वामी वदे जन्म माझा वटवृक्षाखाली ३०० वर्षे वाढल्या पारंब्या, साली॥१॥ अंगावरती वारुळ १००० वर्षे झाली शंकर, पार्वती, दत्त प्रसन्न झाली॥२॥ नाही आदि, नाही अंत लोक म्हणती हाच खरा संत॥३॥ करती पूजा नाही भ्रांत सारे भूमंडळ स्वामींचा प्रांत॥४॥ दया, क्षमा, शांती व्हा निवांत सुखी व्हाल हा जन्म उपरांत॥५॥ दूर करेन भूतबाधा दत्तप्रसन्न बसले हृदयी बघा॥६॥ मनी राहा दक्ष, पूजा वटवृक्ष वाढवा झाडे, हजारो वृक्ष॥७॥ साऱ्या पशू-पक्ष्यांत आहे स्वप्न ब्रह्मा विष्णू महेश माझेच स्थान॥८॥
[email protected]