
गेले अनेक आठवडे या स्तंभात बेस्टवरील वाढता तोटा व त्याची कारणे यांचा ऊहापोह होत असतानाच वाढत्या तोट्यावर उतारा म्हणून अखेर बेस्टने बस प्रवाशांवर भाडेवाढ लादलीच. ही भाडेवाढ जशी अपरिहार्य होती तसेच बेस्टला या भाडेवाढीमुळे थोडेफार सावरायला तरी मिळेल. मात्र भाडेवाड हा अखेरचा उपाय नव्हता. बऱ्याच गोष्टींवर बेस्टने नियंत्रण मिळवले असते वेळीच उपाययोजना केली असती, तर ही बेस्ट बस भाडेवाढ टळली असती. मात्र गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत बेस्टने बस भाडेवाढीची मागणी केली होती तसा प्रस्तावही दिला होता. मुंबई महानगरपालिकेने कोणताही विचार न करता भाडेवाडीस मान्यता दिली. आता राज्य वाहतूक नियमकाकडून परवानगी मिळाल्यानंतर येत्या एक दोन दिवसात ही बस भाडेवाढ लागूही होईल. तसे पाहायला गेले तरी दरवाढ अटळ होती व कधी ना कधी होणारच होती. याने बेस्टला थोडेफार सावरता येईलही मात्र कायमस्वरूपी उभे राहता येणार नाही हे ही खरे. मात्र ही भाडेवाढ पाहिल्यास दुप्पट असून, सध्याच्या तिकिटापेक्षा ७० ते ८० टक्के जास्त आहे. मात्र याच्या परिणामांचाही फेरविचार करण्याची गरज येणाऱ्या काळात करावी लागेल. सध्या वातानुकुलीत बसचे असलेले भाडे सहा रुपयांवरून थेट १२ रुपये म्हणजे दुप्पट होणार आहे तर साध्या बसचे भाडे पाच रुपयाचे १० रुपये होणार आहे. वातानुकूलित बसचे भाडे १३ रुपयावरून थेट वीस रुपये होणार असून साध्या बसेस पंधरा रुपयावरून वीस रुपये होईल. मात्र सध्या साध्या बस गाड्यांची संख्या खूपच मर्यादित असल्याने व वातानुकूलित बस गाड्यांची संख्या जास्त असल्याकारणाने वातानुकूलित बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. याच दरात इतकेच काय तर याच्या पेक्षाही कमी दरात शेअर रिक्षा शेअर टॅक्सीचा पर्याय उपलब्ध झाल्यास बेस्टचे बस प्रवासी मोठ्या प्रमाणात कमी होतील.
आतापर्यंत स्वस्त दरात बस सेवा मिळत होती तिथे प्रवासी रांग लावून बस प्रवास करत होता. तिथे तो आता आपसुकच शेअर टॅक्सी व शेयर रिक्षाला रांग लावेल. मुंबईत लवकरच काही मेट्रो मार्ग सुरू होत आहेत, त्याचा ही फटका बेस्टला बसेल. सध्या बस गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने वेळेवर न येणाऱ्या बस गाड्या हे पाहून स्वतःची खाजगी वाहने विकत घेणाऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढेल व मुंबईत पुन्हा वाहतूककोंडी सारखी स्थिती दिसली तर नवल वाटणार नाही. वास्तविक पाहता त्याकाळी बस भाडेवाढ कमी करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा उद्देशच लोकांनी आपल्या स्वतःच्या गाड्या घरी ठेवाव्यात व सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करावा हा होता. मात्र पालिकेचा उद्देश हा असफल ठरला असून बेस्ट दर कमी केल्याने बेस्ट मात्र तोट्याच्या खड्ड्यात नकळतपणे अडकली मग याची जबाबदारी कोण घेणार हे आता ठरवण्याची वेळ दिली आहे. बेस्टला आर्थिक गरतेतून बाहेर काढण्यासाठी तिकिटांची दरवाढ करणे अपरिहार्य आहे. सध्या बेस्टचा बस ताफा हा २७००वर आला असून भाडेतत्त्वावरील बस गाड्यांची संख्या सध्या मोठी आहे. बेस्टने उत्पन्न वाढीसाठी मिडी बस, मिनी बस गाड्या, टेम्पो अशा नवीन प्रकाराच्या बस गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या. कंत्राटांमधील काही गोष्टी बेस्ट ने गांभीर्याने न घेतल्याने कर्मचारी वर्ग न टिकल्याने तीन कंत्राटदारांनी अचानक बेस्ट मधून काढता पाय घेतला. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बस गाड्यांवर अवलंबून असलेल्या बेस्टला मोठा झटका बसला व बस सेवा ठप्प झाल्या. अचानक झालेल्या या बस कपातीमुळे बेस्ट पासून प्रवासी वर्ग दुरावला व ४३ लाख असलेली प्रवाशांची संख्या थेट ३४ लाखांवर घसरली त्यात आता सध्याच्या बस गाड्या भंगारात निघाल्याने व कंत्राटदाराच्या मोठ्या बस वेळेत न आल्याने बेस्टची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली आणि प्रवाशांनी मग भलेही स्वस्त बस प्रवास असला तरी बेस्ट प्रवासाला रामराम ठोकला. सध्याच्या होणाऱ्या बस भाडेवाडीमध्ये वातानुकूलित बसचे भाडे हे १३ रुपये २० रुपये ३० रुपये ४० रुपये असे आहेत. त्यात कंत्राटदारांनी बस गाड्यांची देखभाल न केल्याने बंद पडलेली वातानुकूलित यंत्रणा ही प्रवाशांसाठी सध्या मोठी डोकेदुखी बनली आहे.
महापालिकेने यंदा ७४,४२७ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला त्यात बेस्टला मात्र वार्षिक तोटा फक्त १५०० कोटी आहे, तो जर पालिका प्रशासनाने दिला असता तर बेस्ट भाडे वाढ ही नक्कीच टळली असती. मात्र हे देखील खरे आहे की आता बेस्टला फक्त कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी ही दरवाढ करायची आहे. कारण ज्या प्रमाणात बेस्टच्या कंत्राटदारांच्या बस सेवा बेस्ट उपक्रमात दाखल होत आहे त्यामुळे बेस्टचा दैनंदिन खर्चही वाढत चालला आहे. गेली तीन ते चार वर्ष बेस्टकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. या दरवाढीने बेस्टचे असलेले उत्पन्न ८४५कोटी आहे. मात्र बस भाडेवाढीनंतर ते १४०० कोटी होईल. मात्र या ६०० कोटींसाठी ३४ लाख मुंबईकर प्रवाशांना वेठीस धरले जाणार आहे. त्यामुळेही जर बेस्ट बस दरवाढ झाली आणि काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या, तर मात्र या दरवाढीचा परिणाम त्या निकालावर काही प्रमाणात तरी लागू शकेल यात शंका नाही!
- अल्पेश म्हात्रे