Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमीरा भाईंदर महापालिकेचे चार वर्षांपासून लेखा परीक्षण बंद

मीरा भाईंदर महापालिकेचे चार वर्षांपासून लेखा परीक्षण बंद

माजी नगरसेवकाकडून महापालिका आयुक्तांकडे तक्रार

भाईंदर : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमानुसार महापालिकेचे प्रत्येक वर्षी लेखा परिक्षण करणे अनिवार्य आहे. यासाठी शासनाकडून प्रभारी मुख्य लेखा परिक्षकांची नियुक्ती केली जाते. या लेखा परिक्षकाकडून लेखा परीक्षण अहवाल प्रत्येक आर्थिक वर्षाला प्रशासनाकडे मान्यतेसाठी सादर करावा लागतो, असे असतानाही मीरा भाईंदर महापालिकेचे गेल्या चार वर्षांपासून लेखा परीक्षण झाले नसल्याचे उघडकीस आले आहे.

महापालिकेच्या आर्थिक कारभारावर देखरेख तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी, अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे दैनंदिन जमा खर्च पाहणे यासाठी शासनाकडून प्रभारी मुख्य लेखा परिक्षकांची नियुक्ती केली जाते. या लेखा परिक्षकाकडून लेखा परीक्षण अहवाल प्रत्येक आर्थिक वर्षाला प्रशासनाकडे मान्यतेसाठी सादर करणे अपेक्षित असते. परंतु गेल्या चार वर्षांपासून लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यात आलेला नसल्याची तक्रार माजी नगरसेवक अजित पाटील यांनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रक्कमा मनपा फंडात जमा झाल्याबाबत संभ्रम

लेखा परिक्षणासाठी महापालिकेने २०२० पासून निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांची लेखापरिक्षक तथा लेखाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या अधिकाऱ्यांच्या पगारावर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असताना कोणत्याही प्रकारचे लेखा परिक्षण झालेले नाही. त्या अधिकाऱ्या कडून परीक्षण करून घेण्याची जबाबदारी मुख्य लेखा परिक्षक, लेखा परिक्षण विभाग यांची असताना त्यांनी आपल्या कामात कसूर केल्याचा आरोप अजित पाटील यांनी केला आहे. महापालिकेकडे जमा होणाऱ्या रक्कमांचे लेखा परिक्षण वेळच्या वेळी करणे आवश्यक असताना कोणतेही लेखा परिक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे जमा झालेल्या रक्कमा महापालिका फंडात जमा झाल्या किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

महापालिकेचे अंतर्गत लेखापरिक्षण वेळच्या वेळी करणे अनिवार्य असताना लेखा परिक्षणात विलंब तसेच दिरंगाई केली असल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा पाटील यांनी करून याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

चार वर्षांपासून लेखा परीक्षण झाले नाही. कोरोना काळात लेखापरिक्षणाचे काम मागे पडले गेले, त्यानंतर या कामाची गती मंदावली होती. आता लेखापरिक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून चारही वर्षांचे लेखापरिक्षण ३१ मार्चपर्यंत पुर्ण होईल. – सुधीर नाकाडी, मुख्य लेखा परिक्षक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -