Saturday, May 4, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सचर्चा तर होणारच...! कुशाग्र बुद्धीचा खेळ

चर्चा तर होणारच…! कुशाग्र बुद्धीचा खेळ

ठरावीक हेतूने दोन क्रियाशील माणसे एकत्र येतात आणि झपाट्याने, वेगाने काम करायला लागतात. त्यामुळे स्वतःबरोबर समाज, प्रेक्षकवर्ग समृद्ध होतो. नाटक क्षेत्रात सुधीर भट आणि गोपाल अलगेरी ही त्यापैकी एक जोडी होती. मनोरंजनाबरोबर दर्जेदार नाटक निर्मिती करण्यात या जोडीने महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावलेली होती. पुढे भट यांचे निधन झाले आणि प्रेक्षकात, माध्यमातून ‘सुयोग’ ही संस्था कोणाची ही चर्चा इतकी टोकाला पोहोचली की, दोन्हीही निर्मात्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याचे ठरवले. ती चर्चा आता विस्मृतीला गेली आहे. या दोन्हीही संस्थेकडून प्रेक्षकांनी चर्चा करावी अशी नाटकाची निर्मिती होताना दिसते. गोपाल अलगेरी यांचे चिरंजीव विनय यांनी आता निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. वडिलांच्या पश्चात निर्मिती क्षेत्रात येणाऱ्या मुलांनी फक्त मनोरंजन करण्याच्या हेतूने नाटकाची निर्मिती केली नाही, तर प्रबोधन आणि प्रेक्षक चिंतन करतील, अशा नाटकाची निर्मिती केली आहे. ही मराठी रंगभूमीसाठी स्वागतार्ह गोष्ट आहे. ‘वेद प्रोडक्शन’ ही अलगेरी यांची संस्था आहे. त्यांनी कल्पना कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन’ या संस्थेला सोबत घेऊन ‘चर्चा तर होणारच’ या नाटकाची निर्मिती केली आहे. यासाठी आर्या विजनचे त्यांनी सहकार्य घेतले आहे. हेमंत ऐदलाबादकर हे या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आहेत.

नाटकात मृणाल आणि सत्यशील हे दोघे तसेच सांगलीतील एक पुस्तक निर्मितीत गुंतलेला आहे, तर दुसरी कष्ट, शोषित महिलांसाठी काम करण्यासाठी पुढे सरसावलेली आहे. दोघांचेही काम वेगळे असले तरी समाज परिवर्तन हे त्यांच्या कार्याचे सूत्र आहे. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी मोर्चा, आंदोलने, प्रतिकार करणे या गोष्टीत हे दोघे सातत्याने भाग घेत असतात. संघर्ष करणे आणि होणाऱ्या अन्यायाला न्याय देणे हा त्यांच्या जिद्द, चिकाटीचा एक भाग आहे. दोघेही एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. जिथे स्पर्धा तिथे सातत्याने ते भाग घेत असल्यामुळे दोस्ताना, वादविवाद या साऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनात सातत्याने घडत असतात. त्यांचा वाद कितीही टोकाचा असला तरी हृदयाच्या कप्प्यात मैत्रीचा ओलावासुद्धा दडलेला आहे. अशा स्थितीत देशपांडे नावाचा एक व्यक्ती स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्या जीवनात येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक कार्य करणारी एक संस्था समाजात सकारात्मक काम करणाऱ्या व्यक्तीला काही लाखाचे अनुदान देते. ठरावीक प्रश्नाची उत्तरे वादविवाद, चर्चा यातून योग्य पद्धतीने जो कोणी उत्तर देईल त्यालाही ही रक्कम दिली जाईल, अशी ही स्पर्धा असते. एवढी मोठी रक्कम मिळणार म्हटल्यानंतर एका प्रशस्त देखण्या बंगल्यात हे तिघे एकत्र आलेले आहेत. नाटकाच्या शीर्षकाप्रमाणे चर्चा तर होणारच, असे काहीसे इथे वाटायला लागते. पुस्तक निर्मिती, परंपरा आणि स्त्रीवाद असावा की नसावा? हे देशपांडे यांचे प्रश्न असतात. यात मृणाल विजेती होते. त्यामागे सुद्धा देशपांडे कोणाच्या तरी सांगण्यावरून कुटिल कारस्थान रचत असतो. त्याचा उलगडा नाटकाच्या अखेरच्या अंकात होतो. या चकित करणाऱ्या प्रसंगापर्यंत घेऊन जाण्यासाठी एदलाबादकर यांनी आपल्या लेखनात जी कसब दाखवलेली आहे. ती कौतुक करणारी आहे. विचार संघर्ष, प्रेक्षकात कुतूहल निर्माण होईल, असे प्रसंग, सोबतीला सहज, उस्फूर्त भाषा आणि अभिनय या साऱ्या गोष्टी नाटक शेवटपर्यंत पाहण्यासाठी प्रवृत्त करतात. कलाकारांचा अभिनय आणि एदलाबादकर यांचे लेखन या सर्व गोष्टीला याला कारणीभूत असल्या तरी लग्न सोहळ्यात अक्षता म्हणून तांदूळ टाकणे, दुधाचा अभिषेक करणे या पलीकडे नव्या विषयांचा शोध लेखकाने घ्यायला हवा. विकृती, संस्कृती, वृत्ती या शब्दांचा वापर करून अनेकदा नव सुविचाराची केलेली निर्मिती वाचनात, ऐकण्यात आलेली आहे. त्यामुळे तोही लेखकांने मोह येथे आवरायला हवा होता, असे वाटते. उत्तम काही पाहायचे आहे, ऐकायचे आहे, तर हे नाटक त्याची पूर्तता करू शकते.

‘चर्चा तर होणारच’ हे नाटक का पाहावे याला उत्तर द्यायचे झाले, तर वेगळा विषय, देखणे सादरीकरण, राहुल रानडे यांचे प्रसंग अवधान राखून केलेले संगीत, प्रेक्षकांची नजर सर्वत्र फिरेल, असे संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य असले तरी यात मृणालची भिडस्त, सामाजिक बांधिलकी जपणारी, बौद्ध विचारसरणीची व्यक्तिरेखा आदिती सारंगधर यांनी केलेली भूमिका सांगता येईल. मृणालचे स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व यात दिसेल असे त्यांनी पाहिलेले आहे. ठासून बोलणे, कळवळा व्यक्त करणे हे असले तरी त्याच्याबरोबर व्यक्तिरेख्या सवयी सुद्धा सतत भूमिकेत डोकावेल, असे पाहिले आहे. संपूर्ण नाटकात भूमिका करताना त्याचे भान ठेवणे हे अभिनयाची जाण असलेला कलाकारच जमू शकतो. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात संभाव्य यादीत आदिती यांचे नाव झळकण्याची शक्यता आहे. आस्ताद काळे यांनी सत्यशीलची भूमिका तेवढीच सर्मथपणे केलेली आहे. हे नाटक प्रभावी होण्याला त्यांची भूमिका तेवढीच कारणीभूत आहे. स्वतःच्या विचाराशी ठाम असणे, वेळप्रसंगी भावूक होणे, संग्रामचे दडपण सारे काही भूमिकेत स्पष्टपणे दाखवले आहे. क्षितीज झारापकर यांनी देशपांडेची व्यक्तिरेखा यात साकारलेली आहे. अस्सल इंग्रजी भाषा, त्यातील लय ही या भूमिकेची गरज आहे. ती अपेक्षितपणे आली नाही, तर भूमिकेला ती मारक ठरू शकते. त्यामुळे तेही तितकेच लक्षात राहतात. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजना तर मंगल केंकरे यांनी वेशभूषाची बाजू सांभाळलेली आहे. ‘चर्चा तर होणारच’ हे नाटक म्हणजे तीन पात्रांचा कुशाग्र बुद्धीचा खेळ सांगता येईल.

-नंदकुमार पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -