गौसखान पठाण
सुधागड-पाली : सुधागड तालुक्याची वऱ्हाड जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील अंबा नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीपात्रात घाण व कचरा, वाळू उपसा यामुळे नदीचे अस्तित्वसुद्धा धोक्यात आले आहे. जांभुळपाडा येथे वाहणाऱ्या अंबा नदीपात्रात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या नद्या आहेत की, डम्पिंग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे.
एकीकडे पर्यावरणप्रेमींकडून नद्या वाचवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. परिसरातील नागरिक कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणून टाकतात. प्रदूषित करण्यासाठी मोठा हातभार लावला जात आहे. बिनधास्त नदीपात्राचे डम्पिंग ग्राऊंड करत आहेत. नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. कायम दुर्गंधी असते. कचऱ्यासोबतच काटेरी झुडपे, मोठी झाडे, कॅरिबॅग तसेच दारूच्या बाटल्यांचा ढीग पडलेला आहे.
नदीपात्रांमधून कचरा व पाणी प्रदूषित होण्याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. घराघरांमधून साठलेला कचरा प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून या ठिकाणी आणून टाकण्यात येतो. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्या ठिकठिकाणी अडकलेल्या दिसतात. नागरिकांनीही पर्यावरण व जलस्रोतांची काळजी घेण्याची गरज आहे अशा प्रकारचा कचरा, प्लास्टिक पिशव्या, दरूच्या बाटल्या या पात्रांत टाकू नयेत, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.