मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातल्या ओमायक्रॉनच्या संसर्गावर सरकारचे बारकाईने लक्ष आहे. रोजच्या रोज याचा अहवाल मागवला जात आहे. ओमायक्रॉनची परिस्थिती आटोक्यात राहिली नाही, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या २८ डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेला देण्यात येणाऱ्या परवानगीवर विचार करावा लागेल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे शिवसेना तसेच काँग्रेस, या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते मात्र बुचकळ्यात पडले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी येत्या २८ डिसेंबरला मुंबईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभा घेणार आहेत. काँग्रेसकडून याकरिता जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली जात आहे.
राज्यात पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आणि दुसरा डोस घेतला नाही अशा लोकांची संख्या जवळपास दीड ते पावणेदोन कोटी आहे. लस उपलब्ध असतानाही हे लोक दुसरा डोस घेत नाहीत. अशा लोकांनी दुसरा डोस घ्यावा म्हणून काही निर्बंध लावण्यावरही सरकार विचार करत आहे, असेही ते म्हणाले.