अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांना सणसणीत टोला
शिरुर : राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर अनेकांनी शरद पवार गट (Sharad Pawar group) सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आपला पाठिंबा दर्शवला. यामध्ये खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या नावाचीही बरीच चर्चा झाली. मात्र, त्यांनी शरद पवार गटामध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते सध्या शरद पवार गटाकडून शिरुर लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) लढवणार आहेत. तर, महायुतीमध्ये शिरुरची जागा अजितदादांना मिळाल्यामुळे अजितदादांकडूनही शिरुर मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु आहे. याअंतर्गत त्यांनी या मतदासंघात आज सभा घेतली. यावेळेस त्यांनी अमोल कोल्हे यांना सणसणीत टोला लगावला आहे. ‘नटनट्यांचं राजकारणात काय काम? उमेदवार मिळत नसेल तर आम्ही कलाकारांना पुढे आणतो’, असं ते म्हणाले आहेत.
शिरूरच्या सभेत अजित पवार म्हणाले, अभिनेता धर्मेंद्र, गोविंदा निवडणुकीला उभे राहतात, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा उभे राहतात, यांचा राजकारणाशी काय संबंध? या नटनट्यांचं राजकारणात काय काम? अमिताभ बच्चनदेखील निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून आले. नंतर त्यांना वाटलं, हे राजकारण आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. सगळं सोडून दिलं. शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायची आवड आहे का हे महत्त्वाचं असतं, असं अजितदादा म्हणाले.
पुढे ते म्हणाले, एखादा नवीन माणूस आला तर सुरुवातीला थोडे दिवस आपल्याला बरं वाटतं. दिसायला चांगला, मिशांना पिळ दिला, राजबिंडा गडी पाहिला की आपण त्याला मत देतो. त्यांना उमेदवारी देऊन, प्रचार करून आमच्याही चुका झाल्या आहेत. आम्हाला काही लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलेलं की हा (खासदार अमोल कोल्हे) चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय. हे कळायला काही मार्ग नाही, असं नाव न घेता अजितदादांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.
कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच
अजितदादा म्हणाले, त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं, पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाला. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या (१९ फेब्रुवारी) दिवशी ते (खासदार अमोल कोल्हे) मला भेटले. मी त्यांना विचारलं, का हो डॉक्टर.. तुम्ही मागे म्हणाला होता की तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे. मग आता तुम्ही परत दंड थोपटले? तर मला म्हणाले, ‘दादा जरा वाटायला लागलंय की आपण परत उभं राहावं.’ पण असं कसं चालेल? मुळात आपल्या मतदारसंघातील प्रश्न सुटले पाहिजेत. आपल्यासमोर महत्त्वाचे प्रश्न आ वासून उभे आहेत. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, अशा शब्दांत अजितदादांनी अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली.