अनधिकृत मशिदींवर कारवाईची मागणी
ठाणे : माहीम येथील समुद्रामधील अनधिकृत मजार हटवण्यात आल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा ठाणे-मुंब्रा परिसराकडे वळवला आहे. माहीमप्रमाणे ठाणे-मुंब्र्यामधील अनधिकृत मशिदींवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
ठाणे-मुंब्रा परिसरात सध्या झपाट्याने अनधिकृतरित्या मशिदीचे बांधकाम करण्यात येत आहे. अनधिकृत मशिदींवर येत्या १५ दिवसात कारवाई झाली नाही तर त्या परिसरामध्ये मंदिर उभारू, असा इशारा मनसेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अनधिकृतपणे मशिद बांधण्यात आली आहे. यावर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे.
याआधी मशिदींवरील भोंग्याच्या संदर्भात आंदोलन हाती घेतल्यानंतर मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान दिले होते. त्यामुळे आव्हाड आणि मनसेचा सामना ठाण्यात पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा अवैध बांधकामांच्या निमित्ताने मनसे आणि आव्हाड पुन्हा एकमेकांच्या विरोधात आमने-सामने उभे टाकलेले आहेत.
मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या इशा-यानंतर मुंब्रामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अशाच प्रकारचा तणाव आता पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मुंब्रा परिसर हा मुस्लिमबहुल परिसर असून, मुंब्रा देवी ही उमऱ्यातल्या डोंगरावर आहे आणि या देवीच्या मार्गाजवळच यांनी हे अधिकृत बांधकाम करण्यात आले असल्यामुळे मनसेदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मुंब्रा परिसरामधील वनविभागाची जागा जी आहे, यावर मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण होत आहे. वनविभागाच्या हद्दीत कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेला वनविभागाची परवानगीदेखील लागत असते. त्यामुळे वनविभाग त्यांच्या जागेत जर लक्ष देऊ शकत नसेल, तर महानगरपालिकादेखील कशी कारवाई करणार असा सवाल पालिका अधिकारी विचारत आहेत. जर वनविभागाने या गोष्टीची गंभीर दखल त्यांनी घेतली आणि त्यांच्या जागा सुरक्षित केल्या तर असे अतिक्रमणा होणार नाहीत असे महापालिका अधिकारी सांगत आहेत.