Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेSamruddhi Highway : समृद्धी महामार्गावर ठाण्यात भीषण दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, १७...

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर ठाण्यात भीषण दुर्घटना, गर्डरसह क्रेन कोसळली, १७ मजुरांचा मृत्यू

शहापूर : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) दुर्घटना आणि अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीत. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. या दुर्घटनेत १२ मजुरांचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेतून सावरत नाही तोच पुन्हा समृद्धी महामार्गावर शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यत १२ मजुरांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधार असल्याने गर्डर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम जोरात सुरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते. सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांवर कोसळली. आतापर्यंत १२ मृतदेह शहापूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बचाव कार्य सुरू असून, १२ व्यक्ती मृत तर ०३ व्यक्ती जखमी

प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलैच्या रात्री २३:०० ते ००:०० वाजताच्या दरम्यान, सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला. ही माहिती ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मंगळवारी मध्यरात्री ०१:०७ वाजताच्या सुमारास समजली. तातडीने सदर घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

सदर क्रेन घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले आहेत. सदर घटनेत १२ व्यक्तीचा मृत्यू झाला असून ०३ व्यक्ती जखमी असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

सदर माहिती ही प्राथमिक माहिती असून, सदर माहिती महसूल सहाय्यक, शहापूर यांच्याकडून मिळाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार घेण्यासाठी पुण्याला येणार आहेत. त्याआधीच काही तास ही दुर्दैवी घटना घडली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांशी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे सुरु झाले आहेत. नागपूर ते इगतपुरीपर्यंत सध्या समृद्धी महामार्ग सुरु आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा शंभर किलोमीटरचा टप्पा येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -