पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले जरी असले तरी, काही नागरिकांना भारत सोडण्याची गरज नाही, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली.
भारत सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा काल दि २७ एप्रिलपासून रद्द झाले आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील २९ एप्रिलपर्यंतच वैध असतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानुसार व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, स्थलांतर, परिषद, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठी व्हिसा असलेल्यांना देखील भारतात आता राहता येणार नसून, आजपासून कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही. असे असले तरी, काही पाकिस्तान नागरिकांना भारतात राहण्याची मुभा असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नेमके काय म्हंटले देवेंद्र फडणवीस?
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावे, असे म्हटले आहे, ते महाराष्ट्रात असणारे सर्व नागरिक सापडले आहेत. पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजे, त्या सर्वांना सांगितले गेले आहे. परंतु सिंधी समाजाचे लोक दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहे. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही. जे पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आले आहे, त्यांना देश सोडावे लागणार आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही, असे वृत्त माध्यमांत झळकले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही- देवेंद्र फडणवीस
“मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय, यावर उलट्या-सुलट्या बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही.” पुण्यातील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.