Monday, April 28, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखजल पर्यटनाची नवी दिशा...

जल पर्यटनाची नवी दिशा…

– सुनील जावडेकर

महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा समुद्र किनाऱ्यांनी वेढलेले आहेत. जलवाहतुकीच्या माध्यमातून जल पर्यटनाचे एक मोठे विस्तीर्ण क्षेत्र आगामी काळात मुंबई त्याचप्रमाणे मुंबई, महानगर क्षेत्र आणि विशेष करून कोकण प्रांत याकरिता खुले होणार आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा मोठा ताण हा निश्चितच आगामी काळात जलवाहतुकीच्या माध्यमातून कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटनाचे एक मोठे विस्तीर्ण क्षेत्र रोजगार स्वयंरोजगार आणि व्यापाऱ्याच्या माध्यमातून खुले होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या अथक आणि सततच्या प्रयत्नांमधून आणि जलवाहतुकीला चालना देण्याच्या प्रयोजनामधून आगामी काळात जलवाहतुकीद्वारे पर्यटनाची दारे मराठी तरुणांना तसेच तरुणींनाही खुली होणार आहेत.

कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वे त्याचप्रमाणे रस्ते महामार्ग आणि त्याचबरोबर आता चीपी आणि मनोहर पर्रीकर विमानतळ या दोन विमानतळामुळे हवाई वाहतुकीचा पर्याय देखील कोकणसाठी आणि गोव्यासाठी उपलब्ध झाला आहे. अर्थात येतील हवाई वाहतुकीचा पर्याय आहे हा तसा महागडा आहे. त्यामुळे तो सर्वसामान्य प्रवाशांना परवडेलच याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे साहजिकच कोकणात किंवा गोव्याला जायचे म्हटले की रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीला आपसुकच प्राधान्य मिळते. कोकण रेल्वेमुळे जरी रेल्वे प्रवासाची मोठी सुविधा उपलब्ध झाली असली तरी अद्यापही कोकणात जाण्यासाठी गाड्यांची संख्या ही तशी मर्यादितच आहे. त्यामुळे साहजिकच कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या आणि कोकणातून पुन्हा मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणे म्हणजे त्याला स्वर्ग दोन बोटे उरणे इतके महत्त्व आहे. गणपती, होळी, कोकणातील जत्रा, यात्रा, उत्सव, शिमगा या काळात तर कोकण रेल्वे हे कायमस्वरूपी हाऊसफूल असते. त्यामुळे बऱ्याचवेळा प्रवाशांच्या पदरी आरक्षित तिकिटाअभावी निराशा पदरी पडते. रस्ते वाहतुकीने जायचे म्हटले, तर एकतर किमान दहा ते बारा तास हे मुंबई ठाण्याहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी लागतात. त्याशिवाय खासगी गाडी भाडे तसेच येण्या जाण्याचा खर्च हा सर्वसामान्य कोकणी माणसाला परवडण्यापलीकडे असतो. मात्र तरीही कोकणात रस्ते मार्गाने जाणारे चाकरमानी स्वतःच्या गाड्या घेऊन अथवा खासगी गाड्या भाड्याने घेऊन मोठ्या प्रमाणावर कोकणात जात-येत असतातच. अर्थात हे सर्व पर्याय जरी कोकणी माणसाला उपलब्ध असले तरीदेखील जलवाहतुकीला चालना देऊन पर्यटनाची एक नवी संधी तसेच एक नवीन क्षितीज हे आगामी काळात मुंबईसह कोकणातील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. याकरता राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे अत्यंत प्रामाणिकपणाने कष्ट घेऊन मुंबई, कोकणातील जलवाहतुकीला चालना देण्याचे काम करत आहेत. यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मंत्री नितेश राणे यांनी मोठी गुड न्यूज दिली असून माझगाव (मुंबई) ते मालवण जलवाहतुकीने अवघ्या पाच तासांत पोहोचता येणार आहे. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा कोकण रेल्वेचे तिकीट जरी मिळाले नाही तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्र सागरी मंडळाने रो रो बोट सेवेद्वारे जलवाहतुकीची जलद सेवा चाकरमान्यांसाठी गणेश चतुर्थीला उपलब्ध करून दिली आहे.

राज्य सरकार जलवाहतुकीच्या क्षेत्रात मोठे काम करत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रात भविष्यात असणाऱ्या जलपर्यटनाच्या संधी लक्षात घेऊन अधिकाधिक काम करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच यंदाच्या गणपती उत्सवात सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्या गणेशभक्तांसाठी माझगावपासून ते थेट मालवणपर्यंत रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. या जलद जलवाहतुकीमुळे अवघ्या पाच तासांत मुंबईकर चाकरमानी हे मालवणला पोहोचू शकणार आहेत. थेट दुचाकी, चारचाकी गाडी घेऊन माझगाव ते मालवण हा जलप्रवास जलदगतीने करता येणे शक्य आहे. ही रो-रो सेवा प्रवाशांबरोबरच त्यांच्या गाड्यांनाही माझगावपासून थेट मालवणपर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी त्यांची गाडी घेऊनच थेट माजगाव येथे बसावे आणि मालवण अथवा विजयदुर्ग येथे पोहोचल्यावर तीच गाडी घेऊन आपल्या गावातील घरी पोहोचावे अशीही डोअर टू डोअर सेवा असणार आहे. याकरता मालवण आणि विजयदुर्ग असे दोन पर्याय देण्यात आले असून ज्यांना मालवण येथे पोहोचायचे असेल त्यांनी मालवणला, तर ज्यांना विजयदुर्ग येथून कोकणातील आपल्या गावी जायचे असेल त्यांच्याकरता विजयदुर्ग येथे दुसरा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी गणपतीच्या निमित्ताने कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना रस्ते वाहतुकीच्या तसेच रेल्वेचे तिकीट न मिळाल्यामुळे होणाऱ्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे. या जलवाहतुकीमुळे कोकण रेल्वे वरील त्याचप्रमाणे रस्ते वाहतुकीवरील प्रवाशांची गर्दी तसेच वाहतुकीवरील ताण हा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून पर्यटन, व्यापार, उद्योग, रोजगार, स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी देखील तरुण-तरुणींसाठी उपलब्ध होणार आहेत. याबरोबरच मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर ट्रान्सपोर्टला म्हणजेच जलवाहतुकीला शासकीय पातळीवर गती देण्याचे काम प्रगतिपथावर असून याबाबतचे डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी नाही मात्र आगामी वर्षात साधारणपणे फेब्रुवारी, मार्चच्या सुमारास कोचीनच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर मेट्रोला मान्यता देण्यात येईल. याकरता मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई, विरार, मीरा-भाईंदर अशा आठ ठिकाणी वॉटर मेट्रो करता टर्मिनल उभारण्यात येणार आहे. वॉटर मेट्रोचा मार्ग निश्चित करून याबाबतचा आराखडा ही अंतिम करण्यात येणार आहे. या वॉटर मेट्रोमुळे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा पडणारा मोठा ताण हा विभागला जाणार असून जलवाहतुकीचा मोठा पर्याय आगामी काळात मुंबई, ठाणे आणि पालघरवासीयाना खुला होऊ शकणार आहे.

मुंबईमध्ये रस्ते वाहतूक आणि उपनगरीय रेल्वे सेवा त्याचबरोबर बेस्ट आणि एमएमआरडीए परिसरातील महापालिकांच्या स्थानिक परिवहन सेवा यांच्यावर प्रवासी वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. एका सर्वेक्षणानुसार मुंबई-ठाणे जिल्हा पालघर आणि रायगड जिल्हा असे जर एमएमआरडीएचे क्षेत्र लक्षात घेतले तर साधारण दररोज दोन ते अडीच हजार नव्या चार चाकी गाड्या या रस्त्यावर येत असतात. वाहनांच्या प्रचंड आणि बेसुमार गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतुक कासव गतीने होत असते. त्यात दररोज काही हजार गाड्यांची भर पडत असल्यामुळे रस्त्यावर कुठेही जरासे खट्ट जरी झाले तरी रस्ते वाहतूक कोलमडून पडते आणि वाहनचालक व प्रवासी हे तासंतास ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडतात. त्यामुळेच रस्ते वाहतुकीला त्याचबरोबर सकाळ-संध्याकाळ आणि अगदी दुपारी देखील तुफान गर्दीत ओसंडून वाहणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय लोकल वाहतुकीला जर जलवाहतुकीची जोड मिळाली तर निश्चितच मुंबई ठाणे जिल्हा पालघर जिल्हा तसेच रायगड जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण अशा मुंबई महानगर क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -