मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतोय. जिथे हल्ला झाला किंवा जे काश्मीरचे पर्यटनाचे ठिकाणं आहेत, तिथे आम्ही जाणार आहोत. काश्मीर भारताच अविभाज्य अंग आहे, तिथे जायला आम्ही घाबरत नाही. तर पर्यटकांना आपल्याच भारतात फिरण्यासाठी कुठेही जाण्याची भिती नाही वाटली पाहिजे. हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे” असं मनसे नेते मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, काश्मीर पर्यटनावर अवलंबून आहे, तेच बंद पाडण्याचा अतिरेक्यांचा, पाकिस्तानचा डाव आहे. तो हाणून पाडायचा असेल, तर देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केलं पाहिजे. हेच दहशतवादाला उत्तर आहे. कुठल्याही परिस्थितीत भारतातील सगळे नागरिक एकत्र येऊ शकतात हा संदेश गेला पाहिजे आणि त्याची सुरूवात आम्ही आमच्यापासून करतोय, असं मनसे देशपांडे म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करुन २६ जणांचे प्राण घेतले. दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर वेगळं केले आणि त्यानंतर हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. दहशतावाद्यांनी केवळ पुरुषांनाच टार्गेट केले आणि त्यांचे प्राण घेतले. त्यामुळे तिथे अडकलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. अनेक पर्यटकांनी काश्मीर सोडलं तर अनेकांनी जाण्याच्या आखलेल्या योजना रद्द केल्या आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटनाला मोठा फटका बसला असून तिथले लोक बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्याचे ठरवले आहे. अनेकांनी काश्मीरला जाण्याच्या योजना रद्द केल्या आहेत. त्यामुळे तिथल्या पर्यटन व्यवसायाचे जबर नुकसान झाले आहे.
अशातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे कार्यकर्ते काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.’आता वेळ आली आहे सर्वांनी एकत्रितपणे या दहशतवादी हल्ल्याला तोंड देणे गरजेचे आहे. या दहशतवाद्यांना नागरिक म्हणून आपण उत्तर दिलं पाहिजे. दहशतवादाचे उत्तर काश्मीरचे पर्यटन आहे. काश्मीरचे लोक बेरोजगार झाले पाहिजेत हेच दहशतवाद्यांचे उद्दिष्ट आहे. जेणेकरुन ते पुन्हा दहशतवादाकडे वळतील. हा डाव उधळून लावायचा असेल तर देशभरातील लोकांनी जेवढे शक्य होईल तेवढे काश्मीरचे पर्यटन केले पाहिजे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. दहशतवादाला उत्तर आम्ही पर्यटनाने देणार आहोत.
काश्मीरमधील परिस्थिती आम्ही बिघडू देणार नाही,’ असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं. “काश्मीरमध्ये पर्यटक जिथे जातात तिथे आम्ही जाणार आहोत. आम्ही काय कुठे जायला घाबरत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारतात कुठेही जायला भीती नाही वाटली पाहिजे हाच संदेश यातून द्यायचा आहे,” असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.