नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार केले. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानभोवतीचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. भारताने पाकिस्तान विरोधात डिप्लोमॅटिक स्ट्राईक अर्थात राजनैतिक हल्ल्याची कारवाई सुरू केली आहे. यामुळे पाकिस्तानच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय
भारताने अमेरिका, रशिया यांच्यासह वीस देशांच्या राजदूतांना बोलावून त्यांना पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. याआधी भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला. अटारी सीमेवरुन भारत – पाकिस्तान दरम्यानचे येणे – जाणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना अती दक्षतेचा इशारा दिला आहे. या पाठोपाठ केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले आहे.लवकरच पाकिस्तानशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाउंट भारतात ब्लॉक होणार असल्याचे वृत्त आहे. याआधी जुलै २०२२, ऑक्टोबर २०२२ आणि मार्च २०२३ मर्यादीत काळासाठी केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स हँडल अर्थात ट्विटर हँडल ब्लॉक केले होते.
मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी असे एकूण २६ पर्यटक ठार झाले होते. अनेक पर्यटक जखमी झाले होते. हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनीच केल्याचे ठोस पुरावे भारताच्या हाती आले आहेत. यानंतर भारताने पाकिस्तानची वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी करायला सुरुवात केली आहे.
भारताने गुरुवारी अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतार, जपान, चीन, रशिया, जर्मनी, फ्रान्स आदी देशांच्या राजदूतांना साउथ ब्लॉक येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याची माहिती जी-२० देशांच्या राजदूतांना दिली. राजदूतांसोबतची परराष्ट्र मंत्रालयाची बैठक सुमारे ३० मिनिटे सुरू होती. या बैठकीआधी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीची अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानची कोंडी करण्याचा निर्णय झाला.
भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला. अटारी सीमेवरुन भारत – पाकिस्तान दरम्यानचे येणे – जाणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या दिल्लीतील दुतावासाचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. आता तर पाकिस्तानमधून वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्यांनाही २९ एप्रिल २०२५ पर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.