कुडाळ (सिंधुदुर्ग) : बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडाने महाराष्ट्र हादरलेला असतानाच, कोकणातल्या कुडाळ तालुक्यातील दोन वर्षांपूर्वीच्या एका खून प्रकरणाचा थरारक तपशील उघडकीस आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर या तरुणाचा मार्च २०२३ मध्ये अपहरण करून खून करण्यात आला होता, आणि त्याचा मृतदेह स्मशानात जाळून पुरावा नष्ट करण्यात आला होता.
खूनाची पार्श्वभूमी
चेंदवण गावातील नाईकनगरमधील सिद्धिविनायक बिडवलकर (Siddhivinayak Bidwalkar) याला, पैशाच्या वादातून, चार संशयितांनी घरातून जबरदस्तीने कारमध्ये उचलून नेले. कुडाळमध्ये त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण इतकी गंभीर होती की, घटनेच्या ठिकाणीच त्याचा मृत्यू झाला.
Thane News : ठाणे जिल्ह्यात अवैध वसतिगृहातून २९ बालकांची सुटका
मृतदेहाची विल्हेवाट – पुरावा नष्ट करण्याचा थरार
मृत्यू झाल्यानंतर, संशयितांनी सावंतवाडीच्या सातार्डा येथील स्मशानभूमीत बिडवलकर याचा मृतदेह जाळून टाकला. हे प्रकरण पोलीस तपासात उघडकीस आले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी :
-
सिद्धेश अशोक शिरसाट
-
अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट
-
गणेश कृष्णा नार्वेकर
-
सर्वेश भास्कर केरकर
पोलिसांनी उकलला खुनाचा गुंता
सिद्धिविनायकचा भाऊ प्रकाश बिडवलकर याने, आपला भाऊ मार्च २०२३ पासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. माधवी चव्हाण या नातेवाईकाच्या तक्रारीवरून, ९ एप्रिल २०२५ रोजी निवती पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा हत्येचा संशय लक्षात घेऊन तपासाचा दिशा बदलला, आणि अखेर दोन वर्षांपूर्वी घडलेला थरारक खून उघडकीस आणला.
खूनामागचं कारण काय?
पोलिस तपासानुसार, या प्रकरणाचा अनधिकृत दारू व्यवसायातून पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंध आहे. पैशाच्या वादातूनच हा अपहरण आणि खून झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका तरुणाच्या प्रकरणाने आज हत्येचा अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आणला आहे. ज्या थंड डोक्याने खून करून मृतदेह जाळून टाकण्यात आला, त्याने कोकणासह राज्यात खळबळ उडवली आहे.