कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल; इतिहास अभ्यासकांकडून नाराजी
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या व इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोरटकर पाच दिवस पोलीस कोठडीत, तर १० दिवस न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर ३० मार्च रोजी त्याला १४ दिवसांची आणखी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्याची जामिनावर सुटका झाली आहे.
काय आहे प्रकरण?
२४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरत धमकी दिली होती. या प्रकारानंतर २५ फेब्रुवारीला सावंत यांनी कोल्हापूरच्या राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
Solapur Crime : सोलापूर हादरलं! विठुरायाचं दर्शन घेऊन आले अन् भर रस्त्यात दाम्पत्यावर गोळीबार
या तक्रारीनंतर २७ फेब्रुवारीला कोरटकरने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. मात्र तो एक महिन्याहून अधिक काळ फरार राहिला. अखेर कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केली होती.
“तांत्रिक कारणांवरून जामीन मंजूर” — वकिलांची टीका
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे म्हणाले, “ज्या कलमांखाली गुन्हा दाखल आहे, त्यात जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींच्या आधारे जामीन मिळणे अपेक्षित होते. मात्र, कोरटकरने केलेल्या वक्तव्यांची गंभीरता लक्षात घेता त्याला जामीन नाकारायला हवा होता.”
सरोदे पुढे म्हणाले, “पोलीस तपास अद्याप पूर्ण झालेला नाही, हे न्यायालयात लेखी दाखवण्यात आले असतानाही त्याला जामीन मिळणे दुर्दैवी आहे. आता कोरटकरने जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्यास आम्ही त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करू.”
कोरटकरचा नंबर मिळवण्याचीही शंका
इंद्रजीत सावंत यांचा मोबाईल नंबर कोरटकरने कोल्हापूर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची भूमिका देखील तपासाअंतर्गत येण्याची शक्यता आहे.
प्रशांत कोरटकरला जामीन मिळाल्यानंतर आता याप्रकरणी पुढे काय होते आणि कोल्हापूर पोलिसांची व न्यायालयाची भूमिका काय असेल, याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे.