निकाल लागणार कधी?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला साथ दिल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण झाले असून या घटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून पुनरावृत्तीही झाली. मुख्यमंत्री व त्यांच्यासोबत बंड केलेल्या १६ आमदारांविरुद्ध ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लावला असला तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मात्र विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या निकालाला दोन महिने उलटून गेल्यानंतरही अजून निकाल लागलेला नाही. त्यातच आणखी वर्षभराने विधानसभेची निवडणूकही लागणार आहे, त्यामुळे हा निकाल कधी लावणार, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.
या संदर्भात निकाल लावण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुरुवातीला शिवसेनेची घटना अभ्यासणार असल्याचे सांगत होते, परंतु, दोन महिन्यांनंतरही उत्तर न मिळाल्याने ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर नार्वेकरांनी दोन्ही गटांकडून उत्तर मागविले होते. ठाकरे गटाने २६२ पानी उत्तर १८ जुलैला दिलं होतं. तर शिंदे गटाने वेळ वाढवून मागितली होती.
यानंतर आता शिंदे गटाने सहा हजार पानांचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. आता एवढ्या पानांचा अभ्यास कधी करणार असा सवालही राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यावर सुनावणीला कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही आणि योग्य प्रकारे निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. त्यामुळे हा निकाल नक्की कधी व कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra