सुनील गावस्कर यांचा सवाल
पोर्ट ऑफ स्पेन (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंपेक्षा मोठ्या नावांना संधी मिळाल्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. काही युवा खेळाडूंना आजमावून पाहणे, असे निवड समितीला का वाटत नाही? असा सवाल त्यांनी केला.
गावस्कर म्हणाले की, ‘तरुण खेळाडूंनी मोठ्या खेळाडूंना आव्हान द्यावे, असे निवडकर्त्यांना वाटत नाही का? विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडीजसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध धावा केल्याचा काय उपयोग? वेस्ट इंडिजचा संघ आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकरिता पात्र होऊ शकला नाही. अशा संघाविरुद्ध तुम्ही धावा करून निवड समितीला काय सांगू इच्छित आहात? भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका जिंकली; पण ही मोठी उपलब्धी नाही.
निवड समितीचे नवे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यपद्धतीत बदल होईल का?, अशीही विचारणा करीत ते म्हणाले, ‘विंडीजच्या दुबळ्या आक्रमणाविरुद्ध रोहित आणि कोहलीच्या धावा काही प्रश्न निर्माण करतात. निवडकर्त्यांनी यातून काय शिकले? काही युवा खेळाडूंना आजमावून पाहणे आणि ते कसोटी क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतात यावर योग्य तो निर्णय घेणे, असे निवड समितीला का वाटत नाही? असा सवाल गावस्कर यांनी उपस्थित केला.