नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत. परंतु या निर्णयाला विविध स्तरावरुन चांगलाच विरोध होत आहे. याविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, यासाठी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये राष्ट्रपती या देशाचे प्रथम नागरिक असून संविधानाच्या अनुच्छेद 79 नुसार संसद भवनाचा महत्त्वाचा भाग आहेत, असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं देखील या याचिकेमध्ये म्हटलं आहे.
आर. जयासुकिन यांनी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी त्यांच्या या याचिकेमध्ये म्हटलं आहे की, “देशाच्या संविधानाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करतात. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात. तसेच संसदेमधील सगळी विधेयकं ही राष्ट्रपतींच्या मंजुरीनेच कायदेशीर केली जातात. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं.”