वसंत भोईर
वाडा : गव्हाचे पीठ किंवा त्यापासून बनणारी चपाती आपल्या भारतीय घरांमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. (health) हल्ली फास्ट लाइफस्टाइलमध्ये खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे आता रेडिमेड पिठाकडे गृहणींचा कल वाढला आहे.
मात्र गिरणीतून दळून आणलेलं पीठ केव्हाही चांगलं, त्यातून सकस पोषण तत्त्वे मिळतात. ते तयार आट्यातून मिळत नाहीत. शिवाय रेडिमेड पीठ अधिक काळ टिकवण्यासाठी केमिकल वापरले जातात, तर चक्कीतून आपल्या गरजेप्रमाणे दळून आणलेलं पीठ आरोग्याला पोषक असल्याचा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
मार्केटमध्ये रेडिमेड आटा मिळतो, त्यामध्ये किडे अथवा जाळी का होत नाही, असा प्रश्न अनेकदा गृहिणींना पडतो. गव्हाचे पीठ दळून ते दोन महिन्यांपर्यंत शिल्लक राहिल्यास किडे व पीठाची जाळी होणे हे नैसर्गिक आहे. तयार पीठावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. ज्याला ‘फ्लोअर इंप्रूव्हर’ म्हणूनदेखील ओळखले जाते. ते मिसळण्याची शासनाची परवानगी मर्यादा फक्त चार मिलिग्रॅम इतकी आहे; परंतु पीठ तयार करणाऱ्या कंपन्या हेच रसायन प्रमाणापेक्षा जास्त मिसळवतात. यामुळे ग्राहकांना मूत्रपिंडाच्या विकाराला सामोरे जावे लागते.
गहू आणि मैद्यातील फरक
गहू हे मुख्यत्वे कार्बोहायड्रेडचे स्रोत आहे. कार्बोहायड्रेडच ग्लुकोज मध्ये रूपांतर होते आणि हेच ग्लुकोज आपण एनर्जी म्हणून दिवसभर काम करण्यासाठी वापरतो, तर गव्हावरील पिवळा स्तर काढल्यावर जो तयार केला जातो. त्याला मैदा म्हटले जाते. त्यामध्ये काहीही पोषक नसते.