कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे आणि परिसरातील गावात सिलिका मायनिंग हा मुख्य व्यवसाय आहे. येथील अर्थव्यवस्था सुद्धा याच मायनिंग व्यवसायावर चालते. या उद्योगात नवी पिढी सुद्धा कार्यरत होत आहे. सिलिका मायनिंग व्यवसाय हा सर्वार्थाने अधिकृत झालेला नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे या सिलिका मायनिंग व्यवसायाला सहकार्य लाभणे गरजेचे आहे. जेणेकरून छोट्या छोट्या तक्रारीवरून हा व्यवसाय बंद पडू नये. त्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे. मी या मतदार संघाचा आमदार म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेन. तुम्ही मायनिंग व्यवसायाला अधिकृत करा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी पियाळी येथील जनसंपर्क कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्याकडे केली.
भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी पियाळी येथे तालुका मंडळ अध्यक्ष संतोष कानडे यांच्या निवासस्थानी जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी कासार्डे परिसरातील मायनिंग व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर आमदार नितेश राणे यांनी चर्चा केली. आपण ज्या रस्त्याने प्रवास केला. तो रस्ता मायनिंग व्यवसायिकांच्या वापरातील आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने चालवावी लागतात. कारण येथील प्रमुख व्यवसाय सिलिका वाळू सप्लाय करण्याचा आहे. चार महिन्यापूर्वी उन्हाळ्यात केलेले रस्ते पावसात खड्डे पडून खराब होतात.
मुख्य व्यवसायात अवजड वाहने चालवण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. मायनिंग व्यवसाय हवाच मात्र इतर जनतेला त्रास होतो तो थांबावा म्हणून कायमस्वरूपी उपाय केला पाहिजे, या भागात अवजड वाहने चालतात म्हणून येथील रस्त्यांचे वेगळा पद्धतीने काम केले गेले पाहिजे. तसे मजबूत रस्ते तयार केले गेले पाहिजेत. जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही. असे आमदार नितेश राणे यांनी चर्चे दरम्यान वस्तुस्थिती मांडली. यावर गांभीर्याने विचार करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा म्हणाले, ज्याप्रमाणे साखर कारखान्यांमध्ये काही प्रमाणात निधी रिझर्व ठेवला जातो. त्याचप्रमाणे सिलिका मायनिंग व्यवसायातील येणाऱ्या टॅक्स मधून काही निधी रिझर्व ठेवला जाईल आणि तो निधी या ठिकाणच्या रस्त्यांसाठी वापरला जाईल तशी पद्धत कासार्डे आणि परिसरातील सिलिका व्यवसायाच्या बाबतीत करण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासनही यावेळी केंद्रीय मंत्री मिश्रा यांनी दिले.
पियाळी येथे तालुका मंडळ अध्यक्ष संतोष कानडे यांच्या निवासस्थानी या पंचक्रोशीतील प्रमुख मंडळींची बैठक झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली माजी आमदार प्रमोद जठार, पटवर्धन, शैलेंद्र दळवी, आधी सह भाजपचे पदाधिकारी राजन चिके, मनोज रावराणे संजय देसाई बाळा जठार प्रकाश पारकर तुळशीदास रावराणे, संजय पतडे, एकनाथ कोकाटे, बंड्या मांजरेकर, कल्याणकर यांच्या सह विविध गावातून आलेले प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांना युवकांनी घडविले मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन
दरम्यान, पियाळी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने, मोठ्या उत्साहात केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचे स्वागत करण्यात आले. ढोल ताशांचा गजर त्याचप्रमाणे एनसीसी विद्यार्थ्यांनी मानवंदना देवून स्वागत केले. तर दांडपट्टा व तलवारबाजीचे खेळ सादर करून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी देवस्थान विषयक आणि बंद पडलेली देवस्थानने या विषयी माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, यांनी प्रश्न मांडले. तंटामुक्त समितीला अधिकृतपना आणा, आणि कायदा करावा अशी मागणी शशांक तळेकर यांनी केली यावेळी, संजय पाताडे, बाळकृष्ण करमलकर, बाळ जठर, अशी मागणी ग्रामप्रतिनिधींनी केली. तर मंत्री मिश्रा यांनी त्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेऊ असे ते म्हणाले.