मुंबई (प्रतिनिधी) : रस्त्याच्या कडेला कित्येक दिवस वाहने धूळखात पडलेली असतात. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. मुंबई वाहतूक पोलीस विभाग अशा वाहनांविरोधात सरसावला आहे. ६ मार्च ते २ जुलै या कालावधीत तब्बल १४ हजार ४६१ धूळखात पडलेली वाहने मुंबई वाहतूक पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने पालिकेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. रस्त्याच्या कडेला धूळखात पडलेल्या वाहनांविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. या विरोधात पालिकेने एक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार ६ मार्च ते २ जुलै या कालावधीत १४ हजार ४६१ वाहने मुंबई वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पुढाकार घेऊन अशी वाहने हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर शहरातील ५० वाहतूक चौकींनी ही मोहीम राबवली आहे. वाहतूक पोलिसांनी ही वाहने उचलून पालिकेकडे सुपूर्द केली आहेत, आणि वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ६ मार्च ते २ जुलै या कालावधीत १४, ४६१ वाहने जप्त केली आहेत. त्यात दुचाकी, ऑटो-रिक्षा आणि चारचाकी वाहने यांचा समावेश आहे. सांताक्रूझ ते दहिसरपर्यंत पसरलेल्या पश्चिम भागात सर्वाधिक ६ हजार १४४ वाहने जप्त केली. घाटकोपर ते मुलुंड परीसरात पोलिसांना ३ हजार ३८३ वाहने रस्त्यावर धूळखात पडलेली आढळली.
वरळी ते कुर्ला आणि वांद्रे आणि खार भागात अशा वाहनांची संख्या कमी आढळली. कुलाबा ते नागपाडा आणि वडाळा या दक्षिण भागात पोलिसांनी २ ,९७३ वाहने – रस्त्यावरून हटवली आहेत. ही मोहीम सुरूच राहणार असून लोकांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावर आठवडाभराहून अधिक काळ धूळखात पडलेले वाहन दिसल्यास वाहतूक पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या ५,००० हून अधिक वाहनांचा लिलाव केला आहे.