Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीभाजपवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा गेला तोल

भाजपवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा गेला तोल

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी मास्टर सभा म्हणून गाजावाजा केलेल्या बीकेसी मैदानावरील जाहीर सभेत भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तोल गेल्याचे आज जनतेला बघायला मिळाले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना त्यांच्या भाषणाची पातळी कमालीची खाली गेली होती. भाजप नेत्यांवर टीका करताना त्यांनी वापरलेली भाषा मुख्यमंत्री पदाला मुळीच शोभादायक नव्हती. अनेक वर्षे भाजपच्या मांडीवर बसून त्यांनी सत्तेचे सर्व काही लाभ घेतले. पण बीकेसीमधील त्यांचे भाषण म्हणजे कृतघ्नपणाच आहे, असे जनतेला वाटले.

उद्धव ठाकरे यांचे भाषण गल्लीतल्या नेत्यालाही मान खाली घालायला लावेल, असे होते. टोमणे मारणे, टिंगल करणे, इशारे व धमक्या देणे हे मुख्यमंत्र्यांना शोभणारे नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणांनी असेच गुन्हे दाखल करण्याचे काम चालू ठेवले, तर तुम्हालाही आम्ही सोडणार नाही, अशी त्यांनी भाजपला धमकी दिली. अशी धमकीची भाषा मुख्यमंत्रीपदाच्या प्रतीमेला काळीमा फासणारी होती. देवेंद्र फडणवीस हे मुंबई आणि महाराष्ट्राविषयी काय बोलले, याविषयी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा ठाकरे यांनी प्रयत्न केला. ‘खोटे बोला पण रेटून बोला’ अशा पद्धतीने ठाकरे यांनी भाषण केले. वांद्र्यातील त्यांच्या घराजवळ येणारी बुलेट ट्रेन त्यांना नको असल्यामुळेच ‘बुलेट ट्रेन आणून मुंबई तोडण्याचा डाव आहे’, असा काल्पनिक आरोप करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव भाजपचा आहे, असे सांगितले म्हणजे मुंबईतील मराठी माणसाची सहानुभूती आपल्याला मिळेल, असे ठाकरे यांना वाटत असेल, तर ते निव्वळ भ्रमात आहेत. ठाकरे यांच्या जुन्या खेळीला मुंबईकर जनता फसणार नाही, अशी चर्चा या सभेनंतर ऐकायला मिळाली

‘बुलेट ट्रेन’ आणून मुंबई तोडण्याचा डाव : उद्धव ठाकरे

‘केंद्र सरकारला मुंबईत बुलेट ट्रेन आणायची आहे. पण तुमच्यापैकी किती जणांना बुलेट ट्रेन हवी आहे? आपल्यापैकी किती जण बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार आहेत? हा मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचा डाव आहे’, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित केलेल्या मास्टर सभेत ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस यांनी १ मे रोजी मुंबईत झालेल्या सभेत अनवधानाने एक गोष्ट बोलून दाखवली. त्यांच्या मालकाची इच्छा त्यांच्या पोटातून ओठावर आली. फडणवीस म्हणाले की, ‘आम्ही मुंबई स्वतंत्र करणार. आता भारत आणि मुंबई पारतंत्र्यात आहे का? पण तुमच्या १७६० पिढ्या आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करता येणार नाही. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे, ती आंदण मिळालेली नाही. त्यामुळे मी एक निक्षून सांगतो की, मुंबईचा लचका तोडणाऱ्यांचे आम्ही तुकडे-तुकडे करु’. ‘देवेंद्र फडणवीस हे आमचे हिंदुत्व गधाधारी होते, अशी टीका करतात. होय, अडीच वर्षांपूर्वी शिवसेना जेव्हा भाजपसोबत होती तेव्हा आम्ही गधाधारी होतोच. आमच्यासोबत तेव्हा घोड्याच्या रुपात गाढव होते. हे गाढव आम्हाला लाथ मारेल हे लक्षात आले तेव्हा आम्हीच त्यांना लाथ मारून बाहेर पडलो’, अशी टीका त्यांनी केली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बीकेसीतील मास्टर सभेत भाजपवर जोरदार टीका केली. तुम्ही टीनपाट लोकांना वाय प्लस, झेड प्लस सुरक्षा देत आहात. गळक्या टीनपाटांचा तुम्हाला काय उपयोग आहे, अशा पद्धतीचा कारभार सुरु आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्राला लगावला. ‘मुंबई आम्ही ओरबडत बसलो असतो तर मराठी आणि इतर भाषिक समुदाय येथे पोहोचला नसता. अनेक गोष्टी आहेत, या गोष्टी आपण बोलून सांगायला पाहिजेत. आता पुन्हा एकदा सांगतो आमची २५ वर्षे युतीत सडली. हाच का आमचा मित्र ज्याला २५ वर्षे सोबत घेतला होता’, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

काश्मिरी पंडितांना सुरक्षा द्या…

काश्मिरी पंडित राहुल भट याला कार्यालयात घुसुन गोळ्या घातल्या. काय करायचे आपण तिथे हनुमान चालीसा म्हणायचं का? काश्मिरी पंडितांना सुरक्षा द्यायला हवी होती, असे ठाकरे म्हणाले. तुम्ही महागाईवर का बोलत नाही. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु झाला आहे. आपल्या रुपयाचा अमृतमहोत्सव झाला आहे. ‘अटल बिहारी वाजपेयी पेट्रोलचे दर ७ पैसे वाढले म्हणून संसदेत बैलगाडीतून गेले होते. ती संवेदनशीलता कुठे गेली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईत भाजपची रामभाऊ म्हाळगी संस्था आहे. त्या ठिकाणी भाजप नेते चिंतन आणि कुंथन करतात. रामभाऊ म्हाळगीमध्ये शिकलेले कुठे गेले आहेत, ते दिसत नाहीत. विनय सहस्त्रबुद्धे दिल्लीत गेले आहेत, तिथे काय शिकवतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. खोटे बोलणे हे त्यांच्या हिंदुत्त्वात बसते. आपल्या हिंदुत्त्वात बसत नाही’, असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -