Monday, April 28, 2025

शोकांतिका…

डॉ. पल्लवी परुळेकर – बनसोडे

‘तिच्या गर्भारशी स्वप्नांचा
इवलासा गाव
मिटल्या गर्भाला तिने
काय द्यावे नाव…?’

मित्तल हॉस्पिटलला उपचारादरम्यान किती वेदनांशी गट्टी जमली ते कळलेच नाही. तिथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची वेदना वेगळी. मात्र त्याची तीव्रता थोड्याफार फरकाने सारखीच होती. कुणी मला तिथे समाधानाची रेघ ओढलेलं दिसलं नाही. अपरिचित अश्रूंची वारी, वरवर जखमांची खोली अंतरीची ओल सुकू देत नव्हती. शारीरिक व्याधींपेक्षा मनावरचा लेपच इथे घेऊन जो तो वावरत होता. कुणी अबोल, तर कुणी उगाचच इतरांच्या उणीधुणीत अडकलेला… पण एक मात्र खरं, इतरांच्या तुलनेत आपलं दुःख कमी वाटायला लागतं… आणि किती वेगवेगळ्या दु:खाशी सहज सलोखा होतो… अशाच एका ‘दुलारी’ आजींशी गट्टी जमली. माझ्या अगदी शेजारच्याच बेडवर त्या होत्या.

सुरुवातीला त्यांना माझ्या आयुष्याची उत्सुकता खूप होती. मी कोण? काय करते? घरी कोण कोण असतं वगैरे वगैरे… सारखं म्हणायची, ‘माझं कुणीच नाही, नवरा नाही, मुलं नाही…’ मग मीही एकदा हटकून विचारलंच… “काय हो, घरी कोण कोण असतं?”

त्या म्हणाल्या, “कोणीच नाही, मी एकटी” मग औषध-पाण्याचं कोण पाहतं?

तेव्हा त्या म्हणाल्या, “माझी भाची आहे ना आणि मीपण आयुष्यभर कष्ट करून जमवलंय की… म्हणूनच तर ही हालत झालीय.”

म्हणजे? “अगं पूर्वी मी म्हावरं विकायची, सतत बर्फात काम करायची त्यामुळे संधिवात झालाय. ही बघ हातापायाची बोटं वाकडी झालीत, कवरे ठणके मारत्यात काय सांगू तुला, नको रं देवा कुणा असं मारू,” असं म्हणत दुलारी आजीने दोन्ही हात वर केले आणि छताकडे पाहिले, जणूकाही कित्येक यातनांचा हिशेब त्या मागत होत्या, मीही क्षणभर भांबावले, काय बोलावं सुचेना, पण माझी अवस्था त्यांना बहुतेक कळली असावी, तशा त्या पुन्हा भाबड्या मनाने सांगू लागल्या.

“नवरा बेवडा, त्यामुळे संसार काही आम्हाला जमलाच नाही… आमच्या दोघांत दारूच जास्त बोलायची” संबंधांचं एकेक बाळंतपण समजावत त्या सिझरिंगचे टाके उसवत गेल्या… मी मात्र खरंच शांत झाले… काय बोलावं काहीच कळेना… दुःख इतकं मूक करणारं असू शकतं? जे ऐकत होते ते इतकं

विलक्षण, भयानक, अनाकलनीय होतं की, विश्वासच बसेना. याच का त्या दुलारी आजी, ज्यांना जाणून घ्यायचं होतं माझं आणि इतरांचही आयुष्य…

आपल्याच तब्बल सात गर्भांना नऊ महिने ओटीपोटात गोंजारून, जन्म देऊन मृत्युशय्येवर निजवावं… असं कसं असू शकतं? एक नाही तब्बल सात मृत्यू एका आईने कळा सोसून या असह्य मरणप्राय यातना भोगाव्या… हा कसला न्याय वेड्या ईश्वरा…! हाच सवाल मन करत होतं… प्रत्येक डिलिव्हरीनिमित्त काळच म्हणता येईल… पण एकही बाळ जगू नये. ही शोकांतिकाच नाही का…?

दुलारी आजी जगत होती. इतरांची मुलं वाढत असताना पोटात साठलेलं पाणी गर्भारशी पाहुण्यासारखी मिरवत…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -