मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत ८४० कोटी रुपयांचे प्रस्ताव आले असताना कोणत्याही प्रस्तावावर चर्चा करू दिली नसल्याचे आरोप भाजप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. यामुळे भाजप सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेत शेवटपर्यंत तीव्र विरोध केला.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर ८४० कोटी रुपयांचे विविध विषय आले होते; मात्र सत्ताधाऱ्यांनी भाजप स्थायी समिती सदस्यांना कोणत्याच विषयावर चर्चा करू दिली नसल्याचा आरोप भाजप सदस्यांनी केला असून यावेळी दहिसर जम्बो कोविड सेंटरचाही प्रस्ताव चर्चेविना मंजूर करण्यात आला. त्याला देखील भाजपने विरोध केला होता. एका कोविड सेंटरसाठी ११ कोटींचे भाडे कशासाठी? एवढ्या खर्चात पालिकेने स्वतःचे कोविड सेंटर उभारले असते, असे भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.
तब्बल ८४० कोटींचे प्रस्ताव आले असताना यावर चर्चा होऊ न देणे हे लोकशाही प्रक्रियेसाठी घातक असून शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होईल म्हणून भाजपच्या सदस्यांना चर्चेपासून प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही शिरसाट म्हणाले. बहुतांश विषय स्थायी समितीत विचारात घ्यायचे नाहीत आणि शेवटच्या दिवशी घाईघाईत मंजूर करायचे, असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.