नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातही कोरोनाचा आलेख पुन्हा वाढत आहे. मागील आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ८० हजारांचा आकडा पार केला आहे. चार महिन्यानंतर या आठवड्यात इतके रुग्णांची नोंद झाल्यामुळं चिंता वाढली आहे. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत मागील आठवड्यात नवीन रुग्णांच्या संख्येत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनाच्या आधीच्या तीन लाटांपेक्षा सध्या संसर्ग वाढत असता तरी मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. मागील आठवड्यात कमीत कमी ९३ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दोन आठवड्यात ४५ आणि ४१ लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. मृतांचा आकडा जरी कमी असला तरी कोरोनाचे वाढते रुग्ण चिंता वाढवणारे आहे. त्यातच, नागरिकांनी कोरोना नियमांकडेही दुर्लक्ष केलं आहे. मास्कचा वापर करणंही कमी झालं आहे.
१३- १९ जून या आठवड्यात भारतात ७९, २५० नवीन रुग्ण सापडले होते. याआधीच्या आठवड्यात ४८, ७८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर, २१ ते २७ फेब्रुवारीनंतर आठवड्यागणिक वाढ होताना दिसत आहे. मागील चार महिन्यांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून कोरोना नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र आहे.
INSACOG – इंडियन सार्स-कोव2 जीनोमिक्स सीक्वेंसिंग कंर्सोटियमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचे सर्व व्हेरियंट खासकरुन बीए.२, बीए.२.३८ आणि बीए.४ आणि बीए.५ देशातील काही राज्यांत आढळले आहेत. त्यामुळंच देशात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
मागील आठवड्यात जवळपास सर्वच राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांत कोरोनाचे आकडे वाढलेले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात २५ हजार १७२ आकडा पार केला आहे. त्यामुळं कोरोना रुग्णांच्या संख्येत ४५ टक्के वाढ झाली आहे. तर, केरळमध्येही ४२ टक्क्यांनी कोरोनाचा धोका वाढला आहे.
मागील आठवड्यात देशात ९३ रुग्णांचा मृत्यू झाला. जो २१- २७ मार्च या आठवड्यादरम्यामचा सर्वाधिक आकडा होता. तेव्हा ९८ जणांचा मृत्यू झाला होता. केरळमध्ये ४० हून अधिक मृत्यू झाले आहेत. तर, महाराष्ट्रात सात दिवसांत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, याआधीच्या आठवड्यात फक्त ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
मुंबई, तिरुवनंतपुरम, पद्दूचेरी, दिल्ली- एनसीआर इथे बीए.२ आणि बीए.२.३८ संसर्ग अधिक आहे. संक्रमणाचा वेग जरी कमी असला तरी रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे आहेत.