डोंबिवली (प्रतिनिधी): आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून भामट्या टोळीने ऑनलाइन गुंतवणूक माध्यमातून डोंबिवली आणि परिसरातील ३७ जणांची एकूण ३५ लाख रुपयांची वर्षभराच्या कालावधीत फसवणूक केली. या गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या ३७ जणांच्या २० हजारापासून ते ४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूक रकमा आहेत. याबाबत एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. ही महिला एका औषध कंपनीत विदारक व्यवस्थापक आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने गेल्या महिन्यात त्यांच्या व्हॉट्सअॅपवर द रोड रिचेस-तेरा नावाने एक गुंतवणूक योजनेचा माहिती देणारा मेसेज आला. २५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास ग्राहकाला ५० टक्के नफा आणि कंपनीला ३० टक्के सूट परतावा मिळेल, असे या महिलेला भुरट्यांनी सांगितले. सुरुवातीला तसा परतावा या महिलेला देण्यात आला. त्यानंतर जाळ्यात ओढल्यावर भामट्यांनी या महिलेची फसवणूक केली़ अशाच पध्दतीने इतर ३६ गुंतवणूकदारांकडून गेल्या वर्षभराच्या कालावधीत या भुरट्यांनी २९ लाख रुपयांची रक्कम गुंतवणुकीच्या नावाखाली वसूल केली.