- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; कुटुंबीयांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन
मुंबई : नेपाळमध्ये उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुटकेसाठी राज्य शासनाकडून तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी किंवा पर्यटनानिमित्त नेपाळमध्ये गेलेले आणि मार्गातील अडथळ्यांमुळे अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
नेपाळमधील या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. काही नागरिक नेपाळच्या पुढे तिबेट भागात गेले होते, तर काही पर्यटकही तेथे अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून राहण्याच्या आणि समन्वय साधण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आल्या आहेत. तसेच, मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) मदत देखील उपलब्ध करून दिली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (Fire Audit) आणि आग प्रतिबंधक सराव (Fire Drill) महिनाभरात पूर्ण करण्याचे ...
सध्या या संपूर्ण आपत्तीमध्ये बाधित झालेल्या किंवा मृत पावलेल्या नागरिकांचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. अचूक आकडेवारी हाती आल्यानंतर त्याबाबतची माहिती जाहीर करण्यात येईल. सध्या शासन पूर्णपणे 'अलर्ट मोड'वर असून, अडकलेल्या कोणत्याही नागरिकाशी संपर्क झाल्यास त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व आवश्यक 'रेस्क्यू' यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नेपाळमध्ये आपले कुटुंबीय किंवा नातेवाईक अडकले असल्यास त्यांनी तात्काळ राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून, विशेषतः मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत करण्यात आले आहे. नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.