- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर
मुंबई : मंत्रालय आणि राज्य सरकारच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर आणि मलाईदार खात्यांवर कब्जा करून बसलेले अधिकारी आता रडारवर आले आहेत. अशा तब्बल ३१४ अधिकाऱ्यांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाने तयार केली असून, गेल्या काही दिवसांपासून या अधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यांच्या दैनंदिन कार्यपद्धतीचा आढावा घेतल्यानंतर आता या अधिकाऱ्यांना तात्काळ इतर विभागात हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही ...
काही अधिकारी तब्बल १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये, विशेषतः महसूल आणि नगरविकास विभाग असो वा अन्य महत्त्वाची खाती, काही विशिष्ट अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी पाय रोवून बसले आहेत. राजकीय नेत्यांशी असलेल्या साटेलोट्यामुळे आणि वरदहस्तामुळे हे अधिकारी एकाच मलाईदार पोस्टवर वर्षानुवर्षे टिकून असतात. अशा अधिकाऱ्यांना शोधून त्यांना धक्का देण्याचे काम आता मुख्यमंत्री कार्यालयाने हाती घेतले आहे.
यापूर्वी मंत्री आस्थापनेवर अनेक वर्षांपासून रुजू असलेल्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करत नवीन अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली होती. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीशिवाय मंत्र्यांच्या आस्थापनेवर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांची कसून छाननी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, काही अधिकारी मधल्या काळात काही काळासाठी इतरत्र जाऊन पुन्हा आपल्या जुन्याच मलाईदार खात्यावर आपले स्थान पक्के करतात, अशा चलाख अधिकाऱ्यांवरही आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सध्या ३१४ अधिकाऱ्यांची नावे समोर आली असली, तरी या मोहिमेत आणखीही काही अधिकारी रडारवर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमुळे मंत्रालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात होणाऱ्या बदल्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.