हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा (Telangana News) जिल्ह्यात एका ४८ वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या झालेल्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पैशांची हाव आणि चैनीचे आयुष्य जगण्याच्या हव्यासापोटी एकाच शाळेतील १० वीच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्याच मुख्याध्यापिकेची २७ वार करून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
२७ वार अन् रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
कोंडामल्लेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका कल्लू रूपा रेड्डी (वय ४८) यांची १२ ऑगस्टच्या सकाळी त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. हैदराबादमध्ये असलेले त्यांचे पती रूपा यांना सतत फोन करत होते, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पतीने शेजाऱ्यांना पाहण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता रूपा रेड्डी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राने तब्बल २७ वार करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने ५ पथके तयार करून सीसीटीव्ही, फॉरेन्सिक पुरावे, फिंगरप्रिंट्स आणि संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवत तब्बल ८० हून अधिक लोकांची चौकशी केली.
रक्षाबंधन (Rakshabandhan 2026) म्हणजे बहिणींसाठी खास नटण्याचा आणि आवडीचे कपडे घालण्याचा सण! बाजारातील महागडे आणि तेच तेच रेडीमेड कपडे घेण्यापेक्षा, यंदा ...
'बाबू' या एका शब्दाने दिला तपासाला दुजोरा
तपासादरम्यान पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा सापडला. फोन बंद होण्यापूर्वी रूपा रेड्डी (Rupa Reddy) आपल्या मावशीशी बोलत होत्या आणि संभाषणातील त्यांचा शेवटचा शब्द 'बाबू' हा होता. पोलीस अधिकारी शरद चंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रूपा रेड्डी सहसा शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना 'बाबू' असे संबोधत असत. त्यामुळे हा गुन्हा शाळेतीलच मुलांनी केला असावा असा संशय बळावला." यानंतर पोलिसांनी १० वीच्या वर्गातील गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना निशाण्यावर धरले. त्यावेळी दोन विद्यार्थी अचानक प्रचंड पैसे उडवत असून मित्रांना महागड्या पार्ट्या देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
वसतिगृहातून काढल्याचा राग अन् चोरीचा कट
संशयित विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी वसतिगृहात या विद्यार्थ्यांच्या बॅगेत रोख रक्कम आणि मोबाईल सापडल्याने मुख्याध्यापिका रूपा रेड्डी यांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले होते. तसेच त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना हॉस्टेलमधून काढून 'डे-स्कॉलर' केले होते. याच रागातून आणि झटपट श्रीमंत होण्याच्या ध्यासातून विद्यार्थ्यांनी चोरीचा बेत आखला. त्यांनी यूट्यूबवर "कमी वेळेत जास्त पैसे कसे कमवायचे?" याचे व्हिडिओही पाहिले होते.
ओळख पटल्याने केला खुनी हल्ला; गोव्याला काढला पळ
गेल्या ५ दिवसांपासून ते मुख्याध्यापिकेच्या घराची रेकी करत होते. पुरावे सापडू नयेत म्हणून त्यांनी आधीच हातमोजे आणि चाकू खरेदी केला होता. घटनेच्या दिवशी तोंडावर मंकी कॅप घालून एका विद्यार्थ्याने घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील २.५० लाख रुपये चोरले. मात्र, पळून जाताना त्याची मंकी कॅप सरकली अन् मुख्याध्यापिकेने त्याला ओळखले. आपण पकडले जाऊ या भीतीने विद्यार्थ्याने त्यांच्यावर चाकूने २७ वार केले. हत्येनंतर रक्ताने माखलेले कपडे गाडून हे दोघेही मौजमजा करण्यासाठी थेट गोव्याला निघून गेले. पोलिसांनी आरोपींकडून १.५४ लाख रुपये रोख (ज्यावर रक्ताचे डाग आहेत), त्यांनी खरेदी केलेला नवा आयफोन आणि मृत मुख्याध्यापिकेचा फोन जप्त केला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.