Tuesday, August 18, 2026

IND vs SL Galle Test : गॉल कसोटी जिंकण्यासाठी भारताला सहा बळींची आवश्यकता

IND vs SL Galle Test : गॉल कसोटी जिंकण्यासाठी भारताला सहा बळींची आवश्यकता

गॉल : गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत केली आहे. भारताने दिलेल्या ३७२ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने दुसऱ्या डावात ४ गडी गमावून ८४ धावा केल्या आहेत. पहिल्या डावातील शतकवीर सोनल दिनुषा (२५*) आणि कर्णधार धनंजय डी सिल्व्हा (३१*) सध्या मैदानात असून, श्रीलंकेला विजयासाठी अजूनही २८८ धावांची गरज आहे.

पहिल्या डावातील १७८ धावांच्या भक्कम आघाडीसह चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल खातेही न उघडता असिथा फर्नांडोच्या चेंडूवर बाद झाला. के. एल. राहुलने (३५) देवदत्त पडिक्कलसोबत (४४) दुसऱ्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंतने रवींद्र जडेजायच्या साथीने ५४ धावांची भागीदारी केली. अखेर भारताचा दुसरा डाव ४९ षटकांत १९३ धावांवर आटोपला आणि श्रीलंकेला ३७२ धावांचे लक्ष्य मिळाले. चहापानानंतर ३७२ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात भारतीय गोलंदाजांनी अत्यंत बिकट केली. भारताच्या शिस्तबद्ध मारासमोर श्रीलंकेची आघाडीची फलंदाजी कोलमडली. भारताकडून फिरकीपटू मानव सुतारने २ बळी टिपले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

ऋषभ पंतचा ऐतिहासिक विक्रम: ऋषभ पंतने अवघ्या ६९ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची धुवाधार खेळी केली. या खेळीदरम्यान पंतने कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला.

पाचव्या दिवसाचे समीकरण : सामन्याच्या अंतिम (पाचव्या) दिवशी भारताला विजय मिळवण्यासाठी ६ बळींची गरज आहे, तर श्रीलंकेला विजयासाठी आणखी २८८ धावांची आवश्यकता आहे किंवा सामना वाचवण्यासाठी पूर्ण तीन सत्रे फलंदाजी करावी लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >