महापालिकेच्यावतीने समुद्रात २१ विसर्जन ठिकाणी बसवणार ओहोटी रेषा दर्शवणारी मार्गदर्शक तरंगचिन्हे
मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील नैसर्गिक विसर्जन स्थळांवर अर्थात समुद्रातील ओहोटीची रेषा दर्शवणारी मार्गदर्शक तरंगचिन्हे आता मुंबई महापालिकेच्या वतीने बसविण्यात येणार आहे. गणेश मूर्ती विसर्जनाकरता समुद्रातील ओहोटी रेषा दर्शवणारी ही तरंगचिन्हे बसविण्यात येणार असून याठिकाणी यासाठीची संपूर्ण मूरिंग यंत्रणा आणि सोलर दिवेही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेशोत्सवात याचा फायदा गणेश मूर्ती आणि देवीच्या मूर्ती विसर्जनादरम्यान भाविकांना होणार आहे. मुंबईतील २१ विसर्जन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पुढील तीन वर्षांकरता कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. ( BMC Ganesh Visarjan)
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून, पुढील काही दिवसांत मुसळधार ...
मुंबईत गणेश उत्सव, नवरात्रोत्सव आणि माधी गणेशोत्सवाच्या मुंबई उच्च न्यायालयाने सन २०२४ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार , मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मूर्ती विसर्जन समुद्रातील ओहोटीची रेषा आणि भरतीची रेषा यांच्यामधील नॉन-इको सेन्सिटिव्ह क्षेत्रातच करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गिरगाव चौपाटीवर प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा बसवण्यात आली होती. (BMC Ganeshotsav)
मुंबईत प्रामुख्याने ४३ ठिकाणी समुद्रात मूर्ती विसर्जन होते, या ४३ ठिकाणी ओहोटीची रेषा दर्शविण्यासाठी, समुद्रातील मार्गदर्शक तरंगचिन्हे (मरीन नेव्हिगेशन बॉयज) या ठिकाणी स्थापित करण्यात येणार असून त्यातील २१ ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यासाठी लिटमस मरीन इन्नोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून तीन वर्षांच्या देखभालीसह ही यंत्रणा बसवण्यासाठी २ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ( Mumbai Municipal Corporation)
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ओहोटीची रेषा ओळखण्यासाठी समुद्रातील मूर्ती विसर्जन स्थळांवर मार्गदर्शक तरंगचिन्हे बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून विसर्जन कार्य करणा-या भाविकांसह महापालिकेच्या कर्मचा-याना ओहोटीची रेषा ओळखता येईल. रात्रीच्या वेळी ही मार्गदर्शक तरंगचिन्हे स्पष्टपणे दिसली जातील. म्हणून त्यावर सौर दिवा बसविण्यात येईल आणि ही तरंगचिन्हे समुद्रातील लाटांमुळे वाहून जाऊ नयेत म्हणून त्यांना समुद्राच्या तळाशी दोरीने स्थिर बांधून ठेवण्यात येईल. ही सर्व मार्गदर्शक तरंगचिन्हे तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात येणार असून, विसर्जन झाल्यानंतर ती काढून घेण्यात येणार आहेत. पुन्हा गणेशोत्सव,नवरात्री व माघी गणेशोत्सव या पुढील सणांच्या विसर्जनाच्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात येणार आहेत. ( Visarjan Safety)






