Nashik : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारतीय सशस्त्र सेनेतील नाशिक जिल्ह्यातील वीर सैनिकांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृती जपण्यासाठी वीर प्रेरणास्थळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वीर जवानांना आदरांजली वाहत, त्यांच्या त्यागाचे स्मरण कायमस्वरूपी राहावे, या हेतूने हे प्रेरणास्थळ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात नाशिक जिल्हा सैनिक कल्याण विभागांतर्गत वीर नारी श्रीमती उषा संतोष डामसे आणि श्रीमती नीता सदाशिव म्हसकर यांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. वीर सैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव करून त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर झालेल्या या उपक्रमामुळे शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करत, नव्या पिढीसमोर देशभक्तीचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांनी म्हटले आहेत.
त्यासोबतच यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, नाशिक विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय , जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, जिल्हा जलसंधारण आदी विविध कार्यालयातील विविध स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरविण्यात आले.
पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम व संजय वायचळे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर उपायुक्त भगीरथ देशमुख यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना अती उत्कृष सेवा पदक आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांना उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार यावेळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय, १०० मी. धावणे परा ॲथलेटिक्स कॉमनवेल्थ गेम मध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल दिलीप महादू गावित याचा सत्कार त्यांनी केला.