Friday, August 14, 2026

Draupadi Murmu : स्वतंत्र भारताला 'विकसित भारत' बनवण्यासाठी कटिबद्ध व्हा! ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशवासियांना आवाहन

Draupadi Murmu : स्वतंत्र भारताला 'विकसित भारत' बनवण्यासाठी कटिबद्ध व्हा! ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत असताना आपल्या तिरंग्याचा अभिमान आणि देशाच्या प्रगतीचा गौरव त्यांनी व्यक्त केला. वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अंत्योदयाच्या भावनेने प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची फळे पोहोचवणे अत्यंत आवश्यक असल्याचे राष्ट्रपतींनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले. (Draupadi Murmu)

देशाच्या जडणघडणीत आणि विकासात समाजातल्या प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. कष्टाळू शेतकरी, समर्पित शिक्षक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, सफाई मित्र, उद्योग विश्वातील व्यावसायिक आणि सीमांवर अहोरात्र रक्षण करणारे सैनिक या सर्वांच्या परिश्रमांमुळेच भारत आज जगातील प्रमुख राष्ट्रांच्या रांगेत आघाडीवर उभा आहे. लोकशाहीच्या या महान उत्सवात प्रत्येकाने आपली मूलभूत कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे हे राष्ट्र उभारणीचे सर्वात मोठे साधन असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. (Viksit Bharat)

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात देशवासीयांनी दाखवलेले ऐक्य आणि त्याग आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील लढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक सुधारणेचे विचार आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५५० हून अधिक संस्थानांचे केलेले एकत्रीकरण या ऐतिहासिक घटनांमुळेच आजचा अखंड आणि मजबूत भारत साकार झाला आहे. फाळणीच्या वेदना सहन करणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या लाखो लोकांच्या त्यागाचे स्मरण करत देश विभाजनाच्या भीषणतेचा इतिहास कधीही विसरू शकत नाही असा सूर राष्ट्रपतींनी लावला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गेल्या एका दशकात देशाने सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शांवर चालत समाजातल्या वंचित घटकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील तब्बल २५ कोटींहून अधिक लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. पंतप्रधान जनधन योजनेच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन कार्यक्रमांतर्गत ५९ कोटी लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले असून यात महिलांची संख्या ३२ कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ६० कोटी नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय संरक्षण दिले जात आहे. भारताने आज जगात सर्वात आधुनिक आणि मोठे डिजिटल पायाभूत नेटवर्क उभारले आहे. आज जगभरात होणाऱ्या एकूण रिअल टाइम डिजिटल व्यवहारांपैकी निम्म्याहून अधिक व्यवहार एकट्या भारतात पार पडतात. ग्रामीण भागातील लहान दुकानांपासून ते रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत सर्वत्र डिजिटल क्रांतीचा प्रभाव पाहायला मिळत आहे. या तंत्रज्ञानामुळे सरकारी योजनांचा लाभ पारदर्शकपणे जनतेपर्यंत पोहोचत आहे. रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई वाहतुकीचा झालेला विस्तार उद्योग व्यवसायांना नवी चालना देत असून यामुळे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत आहेत. (Draupadi Murmu)

जागतिक पातळीवर युद्ध आणि अस्थिरतेची परिस्थिती असतानाही भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे देशाच्या आर्थिक पायाला आणि राष्ट्रीय सुरक्षेला अधिक बळकटी मिळाली आहे. भारताचे परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय हित, वसुधैव कुटुंबकम आणि शांततेच्या तत्त्वांवर आधारित आहे. जागतिक दक्षिण देशांचे नेतृत्व करतानाच संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सर्व देशांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी भारत सातत्याने आग्रही राहिला आहे.

पर्यावरण संवर्धन ही भारतीय संस्कृतीची आणि परंपरेची अविभाज्य बाब आहे. संथाली भाषेतील पंक्तींचा संदर्भ देत राष्ट्रपतींनी निसर्गाचा ऱ्हास थांबवण्याचे आवाहन केले. झाड सुकल्यावर पक्षी जसा शोक करतो, तसाच मानवी संस्कृती आणि निसर्गाचा नाश होताना मानवानेही जागरूक राहिले पाहिजे. एका झाडाचे जतन करणे म्हणजे मानवी समाजाच्या नैतिक मूल्यांचे रक्षण करणे होय. एक पेड माँ के नाम आणि लाईफ यांसारख्या अभियानांतून येणाऱ्या पिढ्यांसाठी निसर्गाची समृद्ध भेट ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. (Draupadi Murmu)

देशातील महिला शक्तीचा वाढता सहभाग आणि यश विशेष अभिमानास्पद आहे. शेतीमध्ये योगदान देणाऱ्या ड्रोन दीदींपासून ते हवाई दलात लढाऊ विमान चालवणाऱ्या महिलांपर्यंत सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच झालेल्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला मिळालेल्या १३ सुवर्णपदकांपैकी ८ सुवर्णपदके महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य पूर्ण झाले असून आता आणखी तीन कोटी नवीन लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे भारतातील लोकशाही अधिक सर्वसमावेशक बनणार आहे.

भारताची ६५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची असून ही युवा शक्ती देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे. नवोपक्रम आणि स्टार्ट अप प्रणालीच्या माध्यमातून भारतीय तरुण जगाला नवी दिशा दाखवत आहेत. सार्वजनिक परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. क्रीडा क्षेत्रात खेलो इंडियाच्या माध्यमातून तळागाळापासून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत.देशातील सुरक्षा आणि अखंडतेच्या बाबतीत भारताने ठाम भूमिका घेतली आहे. दहशतवादाविरोधात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख करत राष्ट्रपतींनी सैन्याच्या शौर्याला सलाम केला. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशाविरोधात सिंधू पाणी करार स्थगित करणे हा देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरला आहे. याशिवाय नक्षलवादाचा संपूर्ण सफाया होणे हे देशाचे मोठे यश असून भूतकाळात नक्षलवादग्रस्त असलेल्या भागात आज विकासाचा नवा सूर्य उगवला आहे आणि तेथील जनता क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहे.मराठा लष्करी परंपरेशी संबंधित १२ किल्ले आणि भगवान बुद्धांच्या पहिल्या उपदेशाचे स्थान असलेले सारनाथ यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणे हा आपल्या समृद्ध वारशाचा गौरव आहे. देश म्हणजे केवळ जमीन किंवा माती नसून देश म्हणजे तेथील सर्व नागरिक आहेत. या सर्वसमावेशक देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्याच्या पवित्र ध्येयासाठी सर्व नागरिकांनी स्वतःला पूर्णपणे समर्पित करावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. (Draupadi Murmu)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा