Friday, August 14, 2026

Ajit Doval : "जमीन, आकाश किंवा पाताळात... आम्ही त्यांचा माग काढू" , 'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंतप्रधान मोदींचा संदेश ; अजित डोवाल यांच्याकडून आठवणींना उजाळा

Ajit Doval :

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट संदेश होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारे मग ते "जमिनीवर असोत, आकाशात असोत किंवा पाताळात, आम्ही त्यांचा माग काढू," असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वरील एका माहितीपटात सांगितले आहे. हा माहितीपट डिस्कव्हरी चॅनल इंडियावर प्रसारित केला जाणार असून देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनापासून याची सुरुवात होत आहे. 'डिक्लासिफाइड ऑपरेशन सिंदूर : द अनटोल्ड स्टोरी' या माहितीपटाच्या ट्रेलरमध्ये डोवाल, माजी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, माजी नौदल प्रमुख एडमिरल दिनेश के. त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह, 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळचे लष्करी मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घाई आणि माजी संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांचे संक्षिप्त मनोगत आहे. (Ajit Doval)

"पंतप्रधान म्हणाले होते, 'जमिनीत असोत, आकाशात असोत, पाताळात असोत, कुठेही असोत, आम्ही त्यांचा माग काढू,'" अशी आठवण डोवाल यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातील आपल्या पहिल्याच दूरचित्रवाणीवरील वक्तव्यात सांगितली. भारताने पाकिस्तानला चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही हे स्पष्टपणे सांगितले होते, असे सेवानिवृत्त जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी नागरिकांची धर्म विचारून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून केला होता. भारतात जातीय तणाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात होते. दहशतवादाचे गुन्हेगार आणि सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी तसेच दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण सुविधा नष्ट करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले होते. पाकिस्तानने वाढवलेल्या संघर्षानंतर भारताने त्यांच्या विमानतळांवर जोरदार मारा केला, ज्यामुळे त्यांना युद्धविरामाची भीक मागण्यास भाग पाडले. (Ajit Doval)

ऑपरेशन महादेव

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले सर्व तीन दहशतवादी लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या 'ऑपरेशन महादेव 'मध्ये मारले गेले. 'ऑपरेशन सिंदूर' हे भारताच्या लष्करी आणि सामरिक शक्तीचे एक महत्त्वपूर्ण प्रदर्शन होते, जे लष्करी आणि अ-लष्करी साधनांच्या संयोजनातून पार पाडले गेले. या बहुआयामी मोहिमेने दहशतवादी धोके प्रभावीपणे नष्ट केले, पाकिस्तानी आक्रमकतेला पायबंद घातला आणि दहशतवादाविरोधातील भारताचे शून्य सहिष्णुतेचे धोरण बळकटपणे लागू केले. या मोहिमेने आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळवताना सामरिक संयम राखला. (Operation Mahadev)

सिंधू पाणी करार रद्द

'ऑपरेशन सिंदूर'मधील एक निर्णायक पाऊल म्हणजे भारताने सिंधू पाणी करार रद्द करणे हा होय. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला आपला पाठिंबा विश्वासार्ह आणि कायमस्वरूपी सोडत नाही, तोपर्यंत १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला जाईल, असे सरकारने जाहीर केले. पाकिस्तानच्या १६ दशलक्ष हेक्टर कृषी जमिनीपैकी ८० टक्के आणि एकूण पाणी वापराच्या ९३ टक्के भागासाठी सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून असलेल्या देशावर याचे दूरगामी परिणाम झाले आहेत. ही प्रणाली २३७ दशलक्ष लोकांना आधार देते आणि गहू, तांदूळ आणि कापूस यांसारख्या पिकांद्वारे पाकिस्तानच्या जीडीपीमध्ये एक चतुर्थांश योगदान देते. (Operation Sindoor)

लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब

'ऑपरेशन सिंदूर' हे केवळ एक नाव नसून ते देशातील लाखो लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आणि न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले होते. "भारत आणि त्याच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी भक्कम पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. युद्धभूमीवर आपण नेहमीच पाकिस्तानचा पराभव केला आहे आणि यावेळी 'ऑपरेशन सिंदूर'ने एक नवा आयाम जोडला आहे," असे त्यांनी म्हटले होते. (PM Narendra Modi)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा