ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील वाढत असलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांसाठी ग्रामीण भागात वस्तीपासून दूर ४ ते ५ एकर शासकीय जागेवर सुसज्ज निवारा शेड उभारण्यात यावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार मुंबई : एकात्मिक जल ...
जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने भटक्या श्वानांचा वावर वाढल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागात या समस्येचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र आणि नियोजित निवारा केंद्राची आवश्यकता असल्याचे डावखरे यांनी निवेदनात नमूद केले आहे. भटक्या श्वानांसाठी निवारा शेड उभारण्याचा विषय यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही घेण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनीही यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे या विषयावर प्रशासकीय पातळीवर तातडीने पुढील कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रस्तावित निवारा केंद्रामध्ये भटक्या श्वानांचे सुरक्षित संगोपन, लसीकरण, निर्बीजीकरण, उपचार तसेच आवश्यक पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देता येतील. यामुळे भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक शिस्तबद्ध पद्धतीने हाताळता येण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही प्रभावी उपाययोजना करता येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपलब्ध शासकीय जमिनींपैकी ग्रामीण वस्तीपासून दूर ४ ते ५ एकर जागा तातडीने निश्चित करावी, अशी मागणी केली. तसेच निवारा केंद्रासाठी आवश्यक निधीची तरतूद, जागा निश्चिती, संबंधित विभागांची जबाबदारी आणि प्रशासकीय मान्यता याबाबतची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली.
नवी दिल्ली : राज्यसभा खासदार म्हणून आपले हे पहिले संसदीय अधिवेशन असल्याचे सांगत भाजप नेते विनोद तावडे यांनी संसदेत झालेल्या गोंधळावरून विरोधकांवर ...
“नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. भटक्या श्वानांची संख्या वाढत असताना या समस्येकडे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांच्या माध्यमातून न पाहता कायमस्वरूपी आणि शास्त्रोक्त पद्धतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागात स्वतंत्र निवारा केंद्र उभारल्यास भटक्या श्वानांचे लसीकरण, निर्बीजीकरण आणि उपचार यासारख्या बाबी व्यवस्थितपणे राबविता येतील. त्यामुळे प्रशासनाने या प्रस्तावावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी,” अशी भूमिका निरंजन डावखरे यांनी मांडली. भटक्या श्वानांच्या प्रश्नावर नागरिकांना दिलासा देण्यासाठी जागा निश्चितीपासून निवारा केंद्र उभारणीपर्यंतची कार्यवाही संबंधित विभागांच्या समन्वयाने गतीने पूर्ण करावी, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला असून, या विषयाचा पुढील पाठपुरावा करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.