नवी दिल्ली : सोशल मीडिया, रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या या आधुनिक युगात तरुणांनी क्षणिक यशाच्या मागे न धावता मेहनत व संघर्षाचा मार्ग निवडायला हवा, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जेन-झी' (Gen-Z) पिढीला दिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या 'ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स' या आत्मचरित्राच्या अनावरण सोहळ्यात पंतप्रधान बोलत होते.
दिल्लीत पार पडलेल्या या कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले की, तरुणांनी इतरांच्या संघर्षातून शिकले पाहिजे आणि अधिकाधिक आत्मचरित्रे वाचली पाहिजेत. "आत्मचरित्रांमुळे एखाद्या विशिष्ट काळातील वास्तव त्या व्यक्तीच्या अनुभवातून जवळून समजून घेण्याची संधी मिळते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे जीवन हे स्पष्ट करते की, केवळ प्रामाणिक मेहनतीच्या बळावर व्यक्ती कोणत्याही अडचणींवर मात करून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकते. त्यांचे जीवन हा भारतीय लोकशाहीचा अमूल्य वारसा असून नवीन पिढीसाठी तो मोठा प्रेरणास्रोत ठरेल," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० रुपये आणि २० रुपये मूल्याच्या प्रत्येकी एक अब्ज प्लास्टिक बँक नोटांना फील्ड ट्रायलसाठी व्यवहारात आणण्यास मंजुरी दिली ...
तरुणाईला मोलाचा संदेश देताना पंतप्रधान मोदींनी एक समर्पक उदाहरण दिले. "अनेकदा लोक उड्डाणपुलाचा वापर न करता घाईघाईत रेल्वे ट्रॅक ओलांडतात. पण तिथली धोक्याची पाटी आपल्याला सतत आठवण करून देत असते की, शॉर्टकटमुळे तुमचे स्वतःचेच नुकसान होऊ शकते. त्यामुळे आयुष्यातही शॉर्टकटचा मोह पूर्णपणे टाळायला हवा आणि शाश्वत यशाचा मार्ग पत्करायचा असतो," असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, सध्या देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलने व नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर तरुणाईशी थेट संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी सरकार व पक्षाकडून डिजिटल रणनीतीवर भर दिला जात असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शेवटी, तरुणांनी वाचनाची सवय जोपासावी आणि संघर्षाच्या वाटेवर चालत शाश्वत यश मिळवावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
कोविंद यांच्या कार्याचा गौरव
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सार्वजनिक कार्याचा गौरव करताना पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रपतीपद सोडल्यानंतरही त्यांनी विश्रांती घेतलेली नाही; ते आजही सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय आहेत. सध्या ते 'एक देश, एक निवडणूक' या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि देशपातळीवरील उपक्रमावर काम करत असून, त्यांचा हा प्रयत्न भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.