Monday, August 10, 2026

Nitesh Rane : वंदे मातरम न म्हणणाऱ्या मदरशांची नोंदणी रद्द करा

Nitesh Rane : वंदे मातरम न म्हणणाऱ्या मदरशांची नोंदणी रद्द करा

- मंत्री नितेश राणे; त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची गरज

मुंबई : ज्या संस्थांमध्ये किंवा मदरशांमध्ये 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' म्हटले जात नाही, अशा सर्व मदरशांची नोंदणी राज्य शासनाने तातडीने रद्द केली पाहिजे, अशी भूमिका राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मांडली. या देशात राहून राष्ट्रीय घोषणा देण्यास विरोध करणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नसून, त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही, असेही ते म्हणाले. (Nitesh Rane)

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १० ते १७ ऑगस्ट या कालावधीत देशभरात राबवल्या जाणाऱ्या 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा शुभारंभ केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री राणे यांनी ही भूमिका मांडली. (Tiranga)

मंत्री नितेश राणे म्हणाले की, जो या भूमीला आपली माता मानतो आणि ज्याच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, तो प्रत्येक नागरिक आज या रॅलीत सहभागी झाला आहे. प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल आणि राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान असणे अत्यंत गरजेचे आहे. देशात राहून ज्यांना 'वंदे मातरम' किंवा 'भारत माता की जय' म्हणायला संकोच वाटतो, त्यांचे या देशावर प्रेम नाही हेच सिद्ध होते. त्यामुळे अशा मनोवृत्तीच्या संस्थांवर कारवाई करत त्यांची अधिकृत नोंदणीच रद्द केली पाहिजे. आपण आपल्या देशाबद्दल आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर अत्यंत कडवट राहिले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. (Har Ghar Tiranga)

राजकीय मतभेद बाजूला सारून नेते एकत्र

- स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित या यात्रेत विधानसभेत आणि स्थानिक राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकणारे नेते एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावर बोलताना मंत्री राणे म्हणाले की, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असण्यापूर्वी आम्ही या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे राष्ट्र प्रथम या विचाराने आमचा तिरंगा आणि आमची निष्ठा एकच आहे हे दाखवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत.

- या भव्य तिरंगा यात्रेला आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, तिरंगा यात्रा अभियान प्रमुख संदीप गावडे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, विशाल परब यांच्यासह भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर जयघोषाने या वेळी संपूर्ण सावंतवाडी परिसर दुमदुमून गेला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >