Wednesday, August 5, 2026

Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी टोचले धनंजय मुंडेंचे कान

Sunil Tatkare : सुनील तटकरेंनी टोचले धनंजय मुंडेंचे कान

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केल्याने नाराजी

मुंबई : बीड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप करून स्वतः पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार धनंजय मुंडे यांचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कान टोचले आहेत. पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत स्थानिक आमदाराने बाजूला बसणे ठीक असले, तरी त्या संवादात स्वतः भाग घेणे आणि बोलणे योग्य नाही, अशा शब्दांत तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

बीड येथील जिल्हा नियोजन समिती आणि इतर महत्त्वाच्या बैठका आटोपल्यानंतर पालकमंत्री या नात्याने सुनेत्रा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. या वेळी पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्नोत्तरांचा प्रसंग आला असता बाजूला बसलेल्या धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना पक्षीय शिष्टाचार आणि राजकीय संकेतांची आठवण करून दिली.

कोणतीही पत्रकार परिषद ही ती आयोजित करणाऱ्या प्रमुख मंत्र्याची किंवा महनीय व्यक्तीची असते. अशा वेळी संबंधित व्यक्तीनेच पत्रकारांशी संवाद साधणे हा त्यातील मुख्य गाभा असतो. यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माझ्या जिल्ह्यात आले असताना झालेल्या पत्रकार परिषदेत मी बाजूला बसून होतो, तिथे मी स्वतः भाष्य केले नाही. बीडमध्ये मुंडे कोणत्या संदर्भात बोलले याची माहिती घेतली जाईल; मात्र मुख्य व्यक्ती उपस्थित असताना बाजूला बसलेल्या इतरांनी हस्तक्षेप न करण्याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. पक्षाचे सर्व सहकारी यापुढे अधिक जबाबदारीने वागतील, असे तटकरे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या 'गुंगी गुडिया' या टीकेचा सुनील तटकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेसने ही वैचारिक दिवाळखोरी दाखवली असून दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपणारा नाही, असे सांगत तटकरे यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

दुसरीकडे, धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडताना माध्यमांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून बीडला आल्या होत्या. दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींमुळे आणि दौऱ्याच्या धावपळीमुळे त्या अत्यंत भावनिक झाल्या होत्या. अशा संवेदनशील प्रसंगी पत्रकारांनी भावनिक विचार करून प्रश्न विचारणे थांबवावे, एवढीच भूमिका आपण मांडली होती, असा दावा मुंडे यांनी केला. तसेच गेल्या काही दिवसांपासून आपली नाहक मीडिया ट्रायल सुरू असून एका विशिष्ट समाजघटकातील व्यक्तीला लक्ष्य केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >