उत्तर प्रदेश : ज्या हातांनी कौतुकाने कुरवाळायला हवे होते, ज्या बापाच्या कुशीत सुरक्षिततेचा निवारा मिळायला हवा होता, त्याच नराधम बापाने आणि भावाने स्वतःच्या दोन निष्पाप चिमुकल्यांची अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खोट्या कौटुंबिक प्रतिष्ठेपोटी (Honour Killing) अवघ्या १३ आणि ११ वर्षांच्या दोन लहान बहिणींचे हसते-खेळते आयुष्य क्रूरतेने संपवण्यात आले. हत्या केल्यानंतर पोलिसांनी संशय येऊ नये म्हणून आत्महत्येचा खोटा बनाव रचत रात्रीच्या अंधारात मृतदेह पुरण्यात आले होते. मात्र, कायद्याच्या तावडीतून हे गुन्हेगार सुटू शकले नाहीत; अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात नराधम बाप आणि भावाची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत मोठा निर्णय दिला आहे.
घरातून बाहेर काढले अन् बागेत घोटला गळा: काय आहे नेमकी घटना?
ही सुन्न करणारी घटना १६ ऑक्टोबर २०१६ रोजी उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील एका गावात घडली होती. घटनेच्या दिवशी मुख्य आरोपी राम प्रसाद याने १३ वर्षांची दयावती आणि ११ वर्षांची धर्मवती या आपल्या दोन निष्पाप मुलींना घरातून बाहेर घालवून दिले. त्यानंतर काहीच वेळात या दोन्ही मुलींनी आंब्याच्या बागेत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आवई कुटुंबाने उठवली. पोलिसांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी आणि आपले पाप लपवण्यासाठी कुटुंबाने कोणालाही न कळवता रात्रीच्या अंधारात गंगा नदीच्या खडार भागात दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह गाडून टाकले.
मुंबई : आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात पार्श्वगायक सोनू निगम यांनी अलीकडेच आपल्या संगीत प्रवासातील एका ...
गाडलेले मृतदेह उकरले अन् 'पोस्टमॉर्टम'ने उघड केला काळा बनाव!
कुटुंब ज्या घाईघाईने अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्न करत होते, त्यावर गावातील माजी सरपंचांना मोठा संशय आला. त्यांनी कोणतीही वेळ न घालवता या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांची विशेष परवानगी मिळवली आणि गंगा नदीच्या पात्रात पुरलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढले. जेव्हा या मृतदेहांचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांच्या अहवालाने सर्वांनाच हादरवून सोडले. मुलींचा मृत्यू आत्महत्येमुळे नाही, तर त्यांची मारहाण करून गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचे अहवालात स्पष्ट झाले, आणि नराधम बाप-भावाचा बनाव चव्हाट्यावर आला.
"पुरावे नष्ट करण्याचा आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न"
या प्रकरणात २०१९ मध्ये ट्रायल कोर्टाने (सत्र न्यायालय) आरोपी वडील राम प्रसाद आणि भाऊ चंद्र भान या दोघांनाही दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र, न्यायमूर्ती जे. जे. मुनीर आणि न्यायमूर्ती विनय कुमार द्विवेदी यांच्या खंडपीठाने आरोपींचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले.
उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अत्यंत कठोर निरीक्षण नोंदवले:
"मुलींच्या मृत्यूनंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देणे, पंचनामा करू न देणे आणि रात्रीच्या अंधारात मृतदेह गाडणे हे आरोपींचे संशयास्पद वर्तन आणि पुरावे नष्ट करण्याचा स्पष्ट प्रयत्न दर्शवते. हे कृत्य केवळ आणि केवळ खोट्या कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी (Honour Killing) करण्यात आले आहे."
अखेर दोन्ही नराधमांची रवानगी तुरुंगात!
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याने आता नराधम बापाला आणि भावाला आयुष्याची उरलेली वर्षे तुरुंगाच्या गजांआडच घालवावी लागणार आहेत. कौटुंबिक प्रतिष्ठेच्या नावाखाली निष्पाप चिमुकल्यांचा बळी घेणाऱ्या अशा नराधमांना मिळालेली ही शिक्षा समाजात एक कठोर संदेश देणारी ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.