Thursday, July 30, 2026

FDA action in Jalgaon : छापील कागदांमध्ये वडापाव विकणे पडले महागात ! ‘एफडीए’ची कारवाई

FDA action in Jalgaon : छापील कागदांमध्ये वडापाव विकणे पडले महागात ! ‘एफडीए’ची कारवाई

FDA action in Jalgaon : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यात ‘एफडीए’ने कारवाई करत भेसळखोर तसेच अन्न व औषध प्रशासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षा मानके कायद्याने छापील कागदांमध्ये खाद्यपदार्थ गुंडाळून विक्री करण्यास बंदी घातलेली असतानाही जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Jalgaon District Collector's Office) परिसरातील एका कॅन्टीनमध्ये सर्रास छापील कागदात वडापाव विक्री होत होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) प्रत्यक्ष ग्राहक बनून कारवाई करत कॅन्टीन चालकाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून (Food and Drug Administration) कारवाईचा धडाका सुरू आहे. नागरिकांना आपल्या आजूबाजूला अन्नभेसळ किंवा एफडीएच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कँटीन, हॉटेल्सबाबत तक्रार करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये छापील कागदात वडापाव व इतर खाद्यपदार्थ दिले जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.

तक्रारीची खातरजमा करण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकाच्या भूमिकेत संबंधित कॅन्टीनमध्ये जाऊन २० रुपयांचा वडापाव विकत घेतला. विक्रेत्याने कोणतीही शंका न बाळगता वडापाव छापील वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आपली ओळख सांगत जागेवरच तपासणी सुरू केली आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कॅन्टीन चालकाविरुद्ध कारवाई (Action against canteen operator) करण्यात आली.

कॅन्टीन चालकाला ५ हजार रुपयांचा दंड

तपासणीत नियमभंग सिद्ध झाल्यानंतर संबंधित कॅन्टीन चालकावर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. चालकाने दंडाची रक्कम तत्काळ भरली. तसेच भविष्यात कोणताही वडापाव, समोसा, भजी किंवा इतर खाद्यपदार्थ छापील कागदात न देता फक्त फूड-ग्रेड कागद किंवा स्टीलच्या ताटलीतच ग्राहकांना देण्याचे आश्वासन दिले. यापुढे नियमांचे उल्लंघन झाल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या परिसरातच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आरोग्याला धोखा

छापील कागदांवर वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे, कॅडमियम , अलाइल नॅप्थलामाइन्ससह विविध विषारी रसायने असतात. गरम, तेलकट किंवा ओलसर पदार्थ अशा कागदात ठेवले असता ही रसायने अन्नामध्ये मिसळतात. परिणामी ही घातक द्रव्ये थेट शरीरात प्रवेश करतात. दीर्घकाळ अशा अन्नाचे सेवन केल्यास पोटाचा कर्करोग, यकृताचे विकार, स्वादुपिंडाचे आजार, मूत्रपिंडाचे विकार तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >