Wednesday, July 29, 2026

Fishing in Maharashtra : महाराष्ट्रात पावसाळी मासेमारीबाबत मोठा निर्णय; १२ सागरी मैलांपलीकडे १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्यास परवानगी

Fishing in Maharashtra : महाराष्ट्रात पावसाळी मासेमारीबाबत मोठा निर्णय; १२ सागरी मैलांपलीकडे १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्यास परवानगी

मुंबई: महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर सुरू असलेल्या पावसाळी मासेमारी बंदीबाबत मत्स्यव्यवसाय विभागाने महत्त्वाची आणि नवीन माहिती जारी केली आहे. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपलीकडील क्षेत्रात (विशेष आर्थिक क्षेत्र - EEZ) १ ऑगस्टपासून मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) १५ ऑगस्टपर्यंत बंदी कायम राहणार आहे.

निर्णयाची मुख्य वैशिष्ट्ये:

१२ सागरी मैलांपलीकडे परवानगी: केंद्र शासनाच्या १६ मार्च २०२६ च्या आदेशानुसार पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) १ जून ते ३१ जुलै २०२६ (६१ दिवस) पर्यंत पावसाळी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली होती. त्यामुळे १ ऑगस्ट २०२६ पासून या क्षेत्रात मासेमारी करण्यास केंद्र शासनाकडून कोणतेही निर्बंध लागू नाहीत. पात्र मासेमारी नौका 'Exclusive Economic Zone Rules, २०२५'चे पालन करून या क्षेत्रात मासेमारी करू शकतात.

किनाऱ्यालगत बंदी कायम: महाराष्ट्र शासनाच्या २९ जून २०२६ च्या आदेशानुसार राज्याच्या जलधी क्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांसाठी १ जून २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ (एकूण ७६ दिवस) या कालावधीत पावसाळी मासेमारी बंदी लागू आहे. या कालावधीत या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची मासेमारी करण्यास सक्त मनाई आहे.

प्रशासनाचे आवाहन आणि कठोर नियम:

मत्स्यसंपत्तीचे दीर्घकालीन संवर्धन, मत्स्यसाठ्याचे रक्षण आणि पारंपारिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी पावसाळा हा माशांच्या प्रजोत्पादनाचा प्रमुख काळ मानला जातो. याच उद्देशाने प्रादेशिक जलक्षेत्रात १५ ऑगस्टपर्यंत बंदी लागू ठेवण्यात आली आहे.

जर बंदीच्या काळात जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मासेमारी करताना कोणी निदर्शनास आले, तर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ (सुधारणा २०२१) मधील तरतुदीनुसार संबंधित नौकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे. सर्व मच्छिमार बांधवांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >