अतिलोभ म्हणजे विनाश !

लोभ हा सर्व पापांचे मूळ आहे आणि अतिलोभ हा विनाशाचे कारण ठरतो.”मानवाच्या गरजा मर्यादित असतात; परंतु इच्छा अमर्यादित असतात. जीवनात प्रगती करण्याची महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे, पण ती महत्त्वाकांक्षा जेव्हा लोभाचे रूप धारण करते, तेव्हा ती माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. गरजेपेक्षा अधिक मिळविण्याची, इतरांचे हक्क बळकावण्याची आणि कोणत्याही मार्गाने संपत्ती, सत्ता किंवा कीर्ती मिळविण्याची प्रवृत्ती म्हणजे अतिलोभ. हा अतिलोभ शेवटी माणसाच्या पतनाला कारणीभूत ठरतो. म्हणूनच म्हटले जाते, “अतिलोभ म्हणजे विनाश.”लोभामुळे माणूस विवेक गमावतो. योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय यातील फरक त्याला कळेनासा होतो. पैसा, संपत्ती किंवा प्रतिष्ठा मिळविण्याच्या हव्यासापोटी तो खोटे बोलतो, फसवणूक करतो, भ्रष्टाचार करतो आणि अनेकदा गुन्हेही करतो. अशा मार्गाने मिळवलेले यश क्षणिक असते; परंतु त्याची शिक्षा मात्र आयुष्यभर भोगावी लागते.
उदाहरण १ - सोन्याची अंडी देणारी कोंबडी


एक शेतकऱ्याकडे रोज एक सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. दररोज मिळणाऱ्या एका अंड्याने तो समाधानी नव्हता. त्याला वाटले, कोंबडीच्या पोटात सर्व सोन्याची अंडी असतील. अतिलोभाने त्याने कोंबडी मारली. पण आत एकही सोन्याचे अंडे नव्हते. परिणामी रोज मिळणारे सोन्याचे अंडेही बंद झाले.
या कथेतून स्पष्ट होते, की अतिलोभामुळे मिळणारेही गमवावे लागते.
उदाहरण २ – महाभारतातील दुर्योधन
महाभारतात दुर्योधनाला स्वतःचे विशाल राज्य असूनही पांडवांचे राज्य हवे होते. त्याच्या लोभामुळे अन्याय, फसवणूक आणि युद्ध घडले. शेवटी कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याचा संपूर्ण वंश नष्ट झाला. जर दुर्योधनाने समाधान मानले असते, तर एवढा विनाश झाला नसता.


उदाहरण ३ - रावणाचा अहंकार आणि लोभ
लंकेचा राजा रावण अत्यंत विद्वान, पराक्रमी आणि संपन्न होता. तरीही सीतेला मिळविण्याच्या लोभामुळे त्याने श्रीरामांशी वैर पत्करले. त्याचा परिणाम म्हणजे लंकेचा विनाश आणि स्वतःचा अंत झाला.
उदाहरण ४ - आजच्या समाजातील वास्तव
आज अनेकजण अधिक पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी भ्रष्टाचार, आर्थिक फसवणूक, बनावट कागदपत्रे, करचोरी आणि लाचखोरीचा मार्ग स्वीकारतात. काही काळ त्यांना यश मिळाल्यासारखे वाटते; परंतु कायद्याच्या कचाट्यात अडकल्यावर प्रतिष्ठा, संपत्ती आणि कुटुंबाचे सुख सर्व काही गमवावे लागते. त्यामुळे प्रामाणिकपणाने मिळवलेले कमी धनही अधिक मौल्यवान असते.
संतांचे विचार


संत तुकाराम महाराज म्हणतात, की समाधान हेच खरे धन आहे. ज्याच्या मनात समाधान असते, तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. लोभ वाढत जातो; पण समाधान माणसाला आनंद, शांतता आणि सुख देते.
महात्मा गांधींचे प्रसिद्ध वचन आहे -
“पृथ्वी प्रत्येकाच्या गरजा भागवू शकते; पण प्रत्येकाच्या लोभासाठी नाही.” या एका वाक्यात लोभाचे संपूर्ण तत्त्वज्ञान सामावलेले आहे.
* गरजा आणि हव्यास यांतील फरक समजून घ्यावा.
* प्रामाणिकपणे परिश्रम करून यश मिळवावे.
* इतरांच्या हक्कांचा आदर करावा.
* समाधान, संयम आणि कृतज्ञता हे गुण जोपासावेत.
पैशापेक्षा चारित्र्य आणि संस्कार यांना अधिक महत्त्व द्यावे.
नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे | अति स्वार्थबुद्धी नरे पाप सांचे । घडे भोगणे पाप ते कर्म खोटे | न होता मनासारखे दुःख मोठे ।
समर्थ म्हणतात, फुकटचा पैसा घरामध्ये घेऊ नये. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून पैसा असावा, पण प्रामाणिकपणे कष्ट करून मिळालेला असावा.
अतिलोभ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो विवेक नष्ट करतो, नाती तोडतो आणि शेवटी विनाशाला आमंत्रण देतो. म्हणून जीवनात मेहनत, प्रामाणिकपणा, संयम आणि समाधान या मूल्यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. समाधानी माणूसच खऱ्या अर्थाने सुखी असतो.
“अति तिथे माती आणि अतिलोभ तिथे विनाश.”
लोभ माणसाला क्षणिक आनंद देतो, पण समाधान आयुष्यभराचे सुख देते. म्हणून लोभ नव्हे, तर प्रामाणिक परिश्रम आणि समाधान हीच खरी संपत्ती आहे.
Comments
Add Comment

कुमार सप्तर्षींची वादळवाट...

डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी एका पिढीला निर्भयपणे विचार मांडण्याची हिंमत दिली.

जिम कॉर्बेटच्या सहवासात…

भटकंती-प्रल्हाद जाधव जिम कॉर्बेट हा नैनिताल येथील कालाढुंगी भागातील एक लोकप्रिय ब्रँड असून अर्थव्यवस्थेचा

अर्जुनाकडून अप्सरांचा उद्धार

महाभारतातील मोतीकण-भालचंद्र ठोंबरे महाभारतातील कुंती पुत्र अर्जुनाकडून शापीत अप्सरांचा उद्धार झाल्याची कथा

तुला न कळले, मला न कळले

नॉस्टॅल्जिया-श्रीनिवास बेलसरे पद्मभूषण ना. सी. फडके हे कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे

बाप

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर बाप मनाच्या एका कोपऱ्यात तो अजून बसला आहे वंशपरंपरेनं विणलेल्या खुर्चीत ठाण मांडून...

कवितेतील मनभावन पाऊस

स्मृतीगंध-लता गुठे पावसाचं आणि माणसाचं नातं हे आदी काळापासून चालत आलेलं आहे. जेव्हापासून शेतीचा शोध लागला आणि