Saturday, July 25, 2026

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात!

मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक स्तरावरील 'द ओशन क्लीनअप' संस्थेच्या इंटरसेप्टर पायलट प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी केली. यावेळी त्यांनी स्वतः नदीपात्रात उतरून यंत्रणेची कार्यपद्धती, तरंगता कचरा अडविण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाचा सखोल आढावा घेतला.

'द ओशन क्लीनअप' ही जागतिक स्वयंसेवी संस्था महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), Plastic Fischer आणि (United Way Mumbai) यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये हा पायलट प्रकल्प राबवत आहे. मालाड आणि ट्रॉम्बे खाडी येथे इंटरसेप्टर तंत्रज्ञानाद्वारे समुद्रात जाणारा प्लास्टिक व इतर तरंगता कचरा नदी-नाल्यांमध्येच अडविण्याचा हा उपक्रम आहे. संस्थेच्या अभ्यासानुसार, मुंबईतून दरवर्षी सुमारे ५० लाख किलो प्लास्टिक अरबी समुद्रात वाहून जाते आणि हा प्रकल्प ते प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या पायलट प्रकल्पाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रायोगिक टप्प्यात इंटरसेप्टर प्रणालीद्वारे कचरा संकलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या खर्चात बचत होत असून, मुंबईकरांनी कररूपाने भरलेला जनतेचा पैसा वाचत आहे. पर्यावरण संरक्षणाबरोबरच सार्वजनिक निधीचा कार्यक्षम, जबाबदार आणि पारदर्शक वापर करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

अलीकडेच मुसळधार पावसामुळे आणि भरतीच्या वेळी जुहू किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा वाहून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. नदी-नाल्यांमधून वाहत आलेला हा कचरा अखेरीस समुद्रात जाऊन किनाऱ्यावर परत येतो. त्यामुळे समुद्री पर्यावरणाचे मोठे नुकसान होते, सागरी जीवसृष्टी धोक्यात येते आणि हा कचरा पुन्हा उचलण्यासाठी महापालिकेला मोठा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत नदी-नाल्यांमध्येच कचरा अडविणारी इंटरसेप्टर प्रणाली मुंबईसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यावेळी तेजिंदर सिंग तिवाना म्हणाले, "लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सूचना देणे किंवा उद्घाटने करणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची गुणवत्ता तपासणे आणि जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविणे हीच खरी लोकसेवा आहे. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक मालाड घडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू."

यावेळी त्यांनी मुंबईकरांना आवाहन करताना सांगितले की, "प्रदूषण रोखणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. नदी, नाले किंवा समुद्रात कचरा फेकू नये. ओला व सुका कचरा याचे योग्य वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी आणि स्वच्छ मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करावे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यासच आपले समुद्र, नद्या आणि किनारे स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे शक्य होईल."

मालाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाशी समन्वय साधत, पर्यावरण संरक्षण, पारदर्शक कारभार, मुंबईकरांच्या कराच्या पैशाची बचत आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून तेजिंदर सिंग तिवाना यांचे कार्य नागरिकांमध्ये विशेष कौतुकास पात्र ठरत आहे. अल्पावधीतच मदत का ठिकाना उपक्रम, खेळाची मैदाने, उद्याने, युवक विकास कार्यक्रम, रोजगार मेळावे, पर्यावरण संवर्धन, पावसाळी 24X7 मदत कक्ष तसेच विविध जनहिताच्या उपक्रमांमुळे तेजिंदर सिंग तिवाना यांनी अपेक्षित लोकप्रतिनिधीची भूमिका प्रभावीपणे पार पाडल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >