देवाभाऊंचा जनोत्सव

राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशा मान्यवरांचे वाढदिवस सर्वत्र नेहमीच उत्साहात साजरे केले जातात. त्यातच ते गाव त्यांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी असेल, तर मग विचारायलाच नको. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहरातच जन्मले, इथेच शिकले आणि नागपुरातूनच त्यांनी राजकारणालाही सुरुवात केली. याच शहरातल्या पश्चिम दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातून ते निवडून येतात. ही त्यांची सहावी टर्म आहे. महाराष्ट्राचे गठन झाले, त्यापूर्वी नागपूर ही जुन्या मध्य प्रांताची राजधानी होती. मात्र तेव्हापासूनच नागपूरचा नागरिक असलेला कोणी मुख्यमंत्री झाला नव्हता. मात्र ऑक्टोबर २०१४ मध्ये सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नागपूरला मुख्यमंत्रीपद लाभले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून फडणवीस ओळखले जातात. त्यांचा तसा दबदबा देखील आहे.



मुख्यमंत्री फडणवीस यांचा छप्पन्नावा वाढदिवस या आठवड्यात बुधवारी म्हणजेच २२ जुलैला होता. त्यानिमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एक महायज्ञ होता, सायकल आणि छत्री वाटप होते आणि इतर कार्यक्रमांचीही रेलचेल होती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दक्षिण पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्र भाजपच्या वतीने रामनगर चौकातील श्रीराम मंदिरात श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या महायज्ञात ५६ समाजातील दांपत्यांनी वैदिक विधीनुसार समिधा अर्पण करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उत्तम दीर्घायुरारोग्य आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रार्थना केली. नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात झालेल्या या महायज्ञाचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला. यज्ञ यागातील सर्व धार्मिक विधी वैदिक परंपरेनुसार पार पडले. वेदमंत्रांचा मंगल घोष, भजनांचा निनाद अशा भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. महाआरती आणि महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली होती.




मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात महाराज अभियान शिबीर आयोजित केले होते. यावेळी २२० बेघरांना मालकी हक्काचे पट्टे, ४०० जणांना स्वामित्व हक्क प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच ९८ शेतमजूर महिलांना शेतकरी प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात आले. बेलतरोडी येथील पाच मंदिर मैदानावर झालेल्या या शिबिराला मार्गदर्शन करताना आम्ही प्रत्येकाला आदर्श प्रशासनाचा प्रत्येक देऊ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.




राज्य सफाई कामगार आयोग आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कामगारांना सहा कोटी रुपयांच्या रिक्षा सायकली आणि जीवन उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री तुमच्याबाबत सकारात्मक आहेत. नागपुरात सफाई कामगारांना लवकरच घरकुले दिली जातील याची खात्री देखील बावनकुळे यांनी यावेळी दिली. यावेळी सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोर,आमदार मोहन मते, आमदार परिणय फुके, महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी प्रभृती उपस्थित होते. याच निमित्ताने भाजप व्यापारी आघाडीतर्फे प्रतापनगर चौकातील ठिय्यावर बसणाऱ्या बांधकाम कामगारांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. याच निमित्ताने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने १५६ भजनी मंडळांकडून विठ्ठल भक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी भजनी मंडळ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अनिल सोले यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गांधीनगर येथे माजी महापौर वसुंधरा मसूरकर यांच्या नेतृत्वात हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात दिवसभर ठीकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आणि सर्वांनीच नागपूरकरांचे लाडके देवाभाऊ फडणवीस यांच्या दीर्घायुरारोग्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना केली.

Comments
Add Comment

सत्ताबदलाची आशा, की नव्या निराशा?

नेपाळमध्ये सध्याचे आंदोलन हे एका सरकारच्या विरोधापुरते मर्यादित नाही, तर लोकांच्या अपेक्षा आणि शासनाच्या

मुत्सद्दी चाल

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन, सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि केंद्र सरकारची राजकीय मुत्सद्देगिरी यामुळे

मराठवाड्यात रेल्वे क्रांतीची नांदी

मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला आता नवी गती मिळणार आहे. धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाकांक्षी २४०

चलनाचा बदलता चेहरा

भारतात रिझर्व्ह बँकेने प्रायोगिक तत्त्वावर दहा रुपयांच्या प्लास्टिक नोटा आणण्याचा निर्णय घेतला होता. सुरक्षित

स्टंटबाजी!

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर या पोलिसांनी असा काही हल्ला चढवला, की त्याच्या चित्रफिती आणि छायाचित्रांनी समाज

निर्भीड पत्रकार: लोकमान्य टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज (२३ जुलै) १७० वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेच्या आठवणींना दिलेला