वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा'; मंत्री भरतशेठ गोगावले यांची आनंदवारीत सेवाभावी चरणसेवा
पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale) यांनी विविध धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कोणताही विशेष शासकीय प्रोटोकॉल न स्वीकारता सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukhmini) मंदिरात जाऊन कळस आणि नामदेव पायरीचे दर्शन घेतले. त्यांच्या या साध्या आणि वारकरी भावनेने अनेक भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
दर्शनानंतर मंत्री गोगावले यांनी कर्नाटकातील बंडींगणीमठाच्या वतीने सुरू असलेल्या अन्नप्रसाद सेवेची भेट घेतली. त्यांनी वारकऱ्यांसोबत जमिनीवर बसून महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी समतेचा आणि सेवाभावाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. (Anandwari)
पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या व्ही.बी.जी. रामजी – विकसित भारत रोजगार हमी योजनेची माहिती ...
यानंतर त्यांनी शिवसेनेतर्फे राबविण्यात आलेल्या 'आनंदवारी – पाऊले चालती पंढरीची वाट' या उपक्रमाला भेट दिली. या सुविधा केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी मोफत नाश्ता आणि भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी, औषधोपचार, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, विश्रांती व्यवस्था तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि माता-बालकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांची त्यांनी पाहणी केली. (Varkari)
यावेळी मंत्री गोगावले यांच्या हस्ते आनंदवारीच्या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले.
सुविधा केंद्रात उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांची त्यांनी विचारपूस केली. काही वारकऱ्यांचे पाय दाबून त्यांची सेवा करत त्यांनी "वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा" हा संदेश दिला. त्यांच्या या कृतीचे अनेक वारकऱ्यांनी स्वागत केले.
दौऱ्यादरम्यान रोजगार हमी विभागाच्या 'संवाद वारी' उपक्रमालाही त्यांनी भेट दिली. चित्ररथ आणि पथनाट्याच्या माध्यमातून व्ही.बी.जी. रामजी योजनेची माहिती वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत होती. मंत्री गोगावले यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अधिकारी, कर्मचारी आणि कलाकारांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिती भालके, रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, शिवसेनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.