नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा पूर्वपरवानगीशिवाय काढण्यात आला होता. काही वेळातच या आंदोलनाला अत्यंत हिंसक वळण लागले. बॅरिकेड्स तोडून पुढे जाणाऱ्या या प्रचंड जनसमुदायाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. अचानक उसळलेल्या या गोंधळामुळे राजधानी दिल्लीतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले.
'आम्ही संसदेत अडकलो होतो आणि घाबरलो होतो' - खासदार कंगना रनौत
#WATCH | Delhi | On the CJP protest outside Parliament yesterday, BJP MP Kangana Ranaut says, "All parliamentarians were inside the Parliament. We all were scared, thinking that the mob might attack us. I appreciate Delhi Police for playing the role of a shield, not letting… pic.twitter.com/Oop3B29PKw
— ANI (@ANI) July 21, 2026
मान्सून अधिवेशनासाठी संसदेत उपस्थित असलेल्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी या घटनेवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी कंगना रनौत यांनी संसदेतील भयावह स्थितीचे वर्णन केले. त्या म्हणाल्या, "आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो. संसदेचे दरवाजेही बंद करण्यात आले होते आणि आम्ही सर्व खासदार आतच कैदेत असल्यासारखे अडकून पडलो होतो. जमाव ज्या आक्रमकतेने पुढे येत होता, ते पाहून एका क्षणी आम्हाला वाटले की आता ते थेट आमच्यावरच हल्ला करतील. आमच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती."
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्राच्या तमाशा ...
दिल्ली पोलिसांच्या शौर्याचे कौतुक
संकटाच्या या वेळी दिल्ली पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे कंगना यांनी विशेष कौतुक केले. कृतज्ञता व्यक्त करत त्या पुढे म्हणाल्या, "मी दिल्ली पोलिसांच्या धाडसाला आणि कर्तव्याला सलाम करते. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्या आणि जमावाच्या मध्ये एका ढालीसारखे काम केले. त्यांनी स्वतःवर दगडांचे घाव झेलले, ते जखमी झाले, परंतु त्यांनी सामान्य जनतेचे आणि संसदेतील लोकांचे कोणतेही नुकसान होऊ दिले नाही."
CJP पक्षाचे आंदोलन आणि पोलिसांसोबतची झटापट
कॉकरोच जनता पार्टी (CJP) मागील एक महिन्यापासून जंतरमंतरवर तळ ठोकून होती. त्यांनी सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती, ज्याला हजारो लोकांनी प्रतिसाद दिला. संसदेकडे जाणारे सर्व रस्ते शेकडो बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते, परंतु आंदोलकांनी गल्लीबोळातून वाट काढत मोर्चा पुढे नेला. सकाळी साडेदहाच्या सुमारास केरळ हाऊसजवळ आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले, तेव्हा पोलिसांनी पहिला लाठीचार्ज केला. त्यानंतर ११.३० वाजता संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर आणि दुपारी बाराच्या सुमारास पटेल चौक व रेल भवन परिसरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट पाहायला मिळाली.
अश्रूधुराचा वापर आणि जमावाची पांगापांग
आंदोलक संसदेच्या गेटपासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावर रायसीना रोडवर पोहोचले होते. अखेर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना मागे ढकलले. या कारवाईनंतर जमाव मध्य दिल्लीच्या विविध भागांमध्ये पांगला गेला. दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात स्पष्ट केले की, वारंवार सूचना देऊनही आंदोलकांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यांनी अत्यंत हिंसक पवित्रा घेत पोलिसांवर दगडफेक केली आणि इतर वस्तू भिरकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस जखमी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
या हिंसक आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी दंगल भडकवणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली प्रथम माहिती अहवाल म्हणजेच एफआयआर (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हिंसाचारात किमान ११८ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सुमारे ७० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, आंदोलकांनी १५ ते २० वाहनांची आणि मोठ्या प्रमाणावर सरकारी मालमत्तेची तोडफोड केल्याचेही पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.