Saamana Movie : 'सामना'चा ५० वर्षांनंतरही तोच दबदबा! चित्रपटगृह हाऊसफुल

- सामनामध्ये आजही प्रेक्षकांना खेचून आणण्याची ताकद - आशिष शेलार


मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकृती 'सामना' प्रदर्शित (Saamana Movie) होऊन तब्बल ५० वर्षे उलटली असली, तरी आजही या चित्रपटाची जादू कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष प्रदर्शनाला रसिकांनी मोठी गर्दी केली. चित्रपटगृह पूर्ण भरल्याने बाहेर स्वतंत्र स्क्रीनची व्यवस्था करून प्रेक्षकांना चित्रपट दाखवावा लागला.


या विशेष प्रदर्शनावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी 'सामना' हा केवळ चित्रपट नसून समाजाला विचार करायला भाग पाडणारा दस्तऐवज असल्याचे सांगितले. "पाच दशकांनंतरही 'सामना'मध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्याची ताकद आहे. हीच या चित्रपटाची खरी ओळख आहे," असे ते म्हणाले.



'सामना'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष प्रदर्शन :


सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे 'सामना'चे विशेष प्रदर्शन (Saamana Movie) आयोजित करण्यात आले होते. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आणि ज्येष्ठ अभिनेते स्व. निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


या कार्यक्रमाला ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक व निर्माते रामदास फुटाणे, सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे, तसेच महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चित्रलेखा खातू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



चित्रपटगृह हाऊसफुल; बाहेरही स्क्रीनची व्यवस्था :


'सामना'च्या विशेष प्रदर्शनासाठी प्रेक्षकांनी (Saamana Movie) मोठी गर्दी केली. लघुनाट्यगृह पूर्ण क्षमतेने भरल्याने अनेक रसिकांना बाहेर स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. पन्नास वर्षांनंतरही 'सामना'बद्दलचा प्रेक्षकांचा उत्साह आणि प्रेम कायम असल्याचे या गर्दीतून दिसून आले.



आजही तितकेच प्रासंगिक विषय :


यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले, "निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या दमदार अभिनयासोबतच डॉ. जब्बार पटेल यांचे प्रभावी दिग्दर्शन आणि विजय तेंडुलकर यांच्या सशक्त लेखणीतून 'सामना'मध्ये सत्ता, नैतिकता, सामाजिक विषमता, सत्तेचा गैरवापर आणि गुन्हेगारीकरण यांसारखे विषय अत्यंत प्रभावीपणे मांडले गेले आहेत. त्यामुळेच हा चित्रपट आजही तेवढाच प्रासंगिक वाटतो." (Saamana Movie)


त्यांनी पुढे सांगितले की, दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा उद्देश केवळ जुने चित्रपट दाखवणे नसून नव्या पिढीला दर्जेदार, विचारप्रवर्तक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध चित्रपटांची ओळख करून देणे हा आहे.



'सामना'च्या निर्मितीमागील रंजक आठवणी :


चित्रपट प्रदर्शनानंतर आयोजित संवाद सत्रात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, निर्माता रामदास फुटाणे आणि गायक रवींद्र साठे यांनी 'सामना'च्या निर्मितीशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला.


रामदास फुटाणे यांनी सांगितले की, चित्रकला शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर वसंत सबनीस आणि दादा कोंडके यांच्या सहवासातून चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. ग्रामीण भागातील राजकारण जवळून पाहिल्यामुळे त्यावर चित्रपट करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी विजय तेंडुलकर यांना लेखनाची विनंती करण्यात आली आणि त्यांच्या संमतीनंतर 'सामना'ची कथा आकाराला आली. या चित्रपटाच्या यशामुळे निर्माता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. (Saamana Movie)



निळू फुले आणि डॉ. लागू यांच्या अभिनयाचा खास किस्सा :


डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटाच्या मुहूर्तावेळचा एक खास प्रसंग सांगितला. त्यांनी सांगितले की, पहिल्याच चित्रपटात निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. एका दृश्याच्या चित्रीकरणावेळी डॉ. लागू हे निळू फुले संवाद कोणत्या आवाजात म्हणणार याचा विचार करत होते. निळू फुले यांनी "जगदंब..." हा संवाद खर्जात उच्चारताच डॉ. लागूंनीही स्वतःच्या आवाजाचा सूर बदलत त्या दृश्यासाठी नव्याने तयारी केली. या दोन महान कलाकारांच्या अभिनयातील सूक्ष्म बारकावे पाहणे हा अविस्मरणीय अनुभव होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. (Saamana Movie)


या संवाद सत्रालाही रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'सामना'च्या सुवर्णमहोत्सवी प्रदर्शनाने मराठी चित्रपटसृष्टीतील या कालातीत कलाकृतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.

Comments
Add Comment

Salman Khan : सलमान खानच्या तब्येतीला काय झालं ? चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल

Ek Hota Maalin Trailer : 'एक होतं माळीण' चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

मुंबई (Mumbai): काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन गाडल्या गेलेल्या माळीण गावाचा थरार आता मोठ्या पडद्यावर

National Film Awards : 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीची दमदार कामगिरी; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले असून

Aamir Khan : आमिर खानला बिश्नोई गँगच्या नावाने धमकी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे खळबळ; ‘लव्ह जिहाद’चा केला उल्लेख

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या (Lawrence Bishnoi Gang) नावाने सोशल मीडियावर (Social Media) धमकी

Upcoming Hollywood Movies Releases : २०२६ मध्ये चित्रपटसृष्टीत महाधमाका! ‘स्पायडर-मॅन’पासून ‘अ‍ॅव्हेंजर्स डूम्सडे’पर्यंत मोठ्या सिनेमांची मेजवानी

हॉलीवूड (Hollywood) सिनेमांसाठी २०२६ हे वर्ष खास ठरणार आहे. क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ (The Odyssey) या बिग बजेट

Aamir Khan On Sonam Wangchuk : 'रँचो' आणि सोनम वांगचुक यांचा संबंध नाही! आमिर खाननं '3 इडियट्स'च्या गैरसमजावर दिलं स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं (Aamir Khan) ‘3 इडियट्स’ (3 Idiots) चित्रपटातील ‘रँचो’ (Rancho) हे पात्र प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम