Saturday, July 18, 2026

Ashish Shelar : प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली, तर उद्धव ठाकरेंनी फक्त त्रास!

Ashish Shelar : प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली, तर उद्धव ठाकरेंनी फक्त त्रास!

मंत्री आशिष शेलार यांचा टोला; रामभक्तीवर बोलण्याआधी त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी

मुंबई : उबाठा गटाकडून सुरू असलेल्या रामरक्षा आंदोलनावरून भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावाला स्वतःहून सत्ता सोपवली होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू राज ठाकरे यांना राजकीय जीवनात कशा प्रकारे त्रास दिला, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असा टोला शेलार यांनी लगावला. रामभक्तीवर बोलण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आधी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे, कारण ज्या काँग्रेसने प्रभू रामाचे अस्तित्वच नाकारले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव यांनी सत्ता उपभोगली, असा घणाघातही शेलार यांनी केला.(Ashish Shelar)

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. विशिष्ट मंडळींना खूश करण्यासाठीच उद्धव ठाकरे हे आंदोलन करत आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राम मंदिर तिजोरीतील कथित अपहाराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलेले नाही. ज्यांचा यात हात आहे, त्यांच्या चौकशीसाठी तातडीने एसआयटी स्थापन करण्यात आली असून दोषींना अटकही झाली आहे, तर काहींनी राजीनामेही दिले आहेत.

मनसे आणि उबाठाच्या ऐक्याबाबत पत्रकारांनी विचारले असता शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोन भावांनी किंवा त्यांच्या पक्षांनी एकत्र यावे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक व अंतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे विचाराल तर सध्या त्यांच्यात कसलेही ऐक्य राहिलेले नाही, हे उघड झाले आहे. उबाठा गटाच्या या रामरक्षा आंदोलनापासून काँग्रेसने स्वतःला लांब ठेवले आहे. संजय राऊत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना या आंदोलनाचे आमंत्रण देतात, मात्र स्वतःच्या आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना बोलवत नाहीत, असा चिमटाही शेलार यांनी काढला.

आंदोलनाचे राजकारण करणे चुकीचे

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईवरून सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच पोलिसांनी संवेदनशीलपणे ही कारवाई केली आहे, मात्र राऊत नेहमीप्रमाणे याचा विपर्यास करत आहेत. 'नीट' परीक्षेतील गोंधळावरही सरकारने कोणालाही पाठीशी घातलेले नाही. पोलिसांनी तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक केली असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच परीक्षा पार पडली आहे. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असला, तरी त्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे, असे शेलार म्हणाले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चांवर अधिक बोलणे त्यांनी टाळले असून, दोन्ही पक्षांचे नेते आपापसात चर्चा करून काय तो निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा