Friday, July 17, 2026

Chandrashekhar Bawankule : सर्वांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रभू रामांची आठवण; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

Chandrashekhar Bawankule : सर्वांनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रभू रामांची आठवण; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण असूनही फिरवली पाठ

मुंबई : "उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन हा एकप्रकारे ढोंगीपणा असून आता सर्वांनी साथ सोडल्यानंतर त्यांना प्रभू रामांची आठवण झाली आहे", अशी टीका महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली.

नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे भरकटल्यामुळे आज पुन्हा वेदना होतील. ज्यावेळी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होती त्यावेळी निमंत्रण असूनही उद्धव ठाकरे गेले नाहीत. त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांना राजकारणाचा विषय केल्याचे वाईट वाटते. राजकारणासाठी कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्यासाठी प्रभू रामचंद्र हा आस्था आणि संस्कार संस्कृतीचा विषय आहे. पण आता जनाधार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने राजकारण करून मतांची व्होटबँक तयार करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा खरंच रस्त्यावर उतरण्याची गरज होती तेव्हा ते उतरले नाहीत. आता सर्वच लोकांनी ठाकरेंना सोडल्यानंतर त्यांना भगवान प्रभू रामचंद्रांची आठवण येत आहे.”

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निमंत्रणावर बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदूत्व शिकवण्याची गरज नाही. त्यांचे आयुष्य हिंदू धर्माचे संस्कार, संस्कृती जतन करण्यासाठी गेले आहे. देव, देश आणि धर्म कार्यासाठी आयुष्य देणारे ते आहेत. त्यामुळे अशा पत्रांनी कुणी डिवचले तरी त्यांच्या भूमिकेत काहीही फरक पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे भगवान प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त आहेत. बाबरी मशीदीच्यावेळी जेव्हा ते कारसेवा करत होते तेव्हा हे सगळे लोक झोप घेत होते. त्यामुळे देवेंद्रजींबद्दल बोलून त्यांना काहीही मिळणार नाही.”

प्रभू श्रीरामचंद्रांच्या नावाने राजकारणाचा अड्डा करण्याचा प्रयत्न

“सकारात्मक भूमिकेतूनच महाराष्ट्रात आपला पक्ष वाढू शकतो. नकारात्मक भूमिकेत जनता तुम्हाला कधीही साथ देत नाही, हे अजूनही विरोधी पक्षाला समजलेले नाही हे दुर्दैव आहे. आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे. पण मागच्या काळात त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तांबद्दल आणि भूमिकेबद्दल काय वक्तव्य केले हे तपासले पाहिजे. जेव्हा भगवा फडकवण्याची वेळी आली तेव्हा तुम्ही पाकिस्तानचे ध्वज फडकवले. प्रभू रामचंद्राचा गजर करण्याच्या वेळी तुम्ही मतांचे लांगुलचालन केले. आंदोलनापूर्वीच्या पाच वर्षांत त्यांच्या भूमिका कशा बदलल्या हे बघितले पाहिजे. सत्ता असताना वेगळी भूमिका आणि सत्ता गेल्यावर वेगळी भूमिका पाहायला मिळाली. महाराष्ट्र हे कधीच सहन करत नाही. भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव घेऊन केवळ राजकारणाचा अड्डा करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे जनतेला माहिती आहे,” असेही ते म्हणाले.

जयंत पाटील यांच्या भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “जयंत पाटील माझ्याकडेही येऊन गेलेत. एका विषयावर त्यांच्यासोबत दोन तास बैठक झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी जाणे हे काही राजकारणाचे विषय नाहीत. राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे.”

शेतरस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणार

“महसुल विभागाने राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना सुरु केली आहे. राज्यातील महिला बचत गटांना प्रत्येकी अडीच एकर जागा देणे आणि एक लक्ष रुपयांचे फिरते भांडवल देऊन तिथे चारा आणि बांबू लागवड करणार आहोत. सरकारच्या सहयोगाने महिला बचत गटांना उत्पन्न मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासोबतच शेतकऱ्यांचे सर्व प्रकारच्या शेत रस्त्यांचे सीमांकन करून दोन्ही बाजूंना झाडे लावण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत. शेतरस्ते खुले करण्याची आमची भूमिका आहे. ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाची अंमलबजावणी शेत पाणंद रस्त्यांवर करणार आहोत. शेत पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्णय करणार असून लवकरच याबाबतचा शासन निर्णय येईल,” अशी माहितीही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सुनेत्रा पवार नाराज नाहीत

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, “असे काही असेल असे मला वाटत नाही. या कपोलकल्पित बातम्या पेरल्या जातात. महायुती चांगल्या पद्धतीने काम करत आहे. पण कधी एकनाथ शिंदे तर कधी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जातात. मात्र, आमच्यात चांगला संवाद असून आमचे काम महाविकास आघाडीसारखे नाही. सोबत असूनही एकमेकांचे चेहरे बघत नाहीत, अशी महाविकास आघाडीची परिस्थिती आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीए सांभाळण्याची भूमिका असून तीच भूमिका देवेंद्र फडणवीस आणि आमचीही आहे.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा