Kolhapur Vaibhavwadi Railway Line :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

मंत्री नितेश राणे; ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनासाठी प्रयत्न


मुंबई (सुहास शेलार) : "कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बहुप्रतीक्षित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने 'डीपीआर' (सविस्तर प्रकल्प अहवाल) टप्प्यातून पुढे जात, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे भूमिपूजन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत", अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी दिली.


एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंत्री राणे यांनी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचे व्हिजन मांडले. राणे म्हणाले, कोकण रेल्वेला सध्या दरमहा तब्बल ५ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे खासदार नारायण राणे(NarayanRane) यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे हा मार्ग 'सेंट्रल रेल्वे'मध्ये (मध्य रेल्वे) समाविष्ट (इंटिग्रेट) करून घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कोकणातील रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि शेड उभारणीसारख्या साध्या कामांच्या परवानग्या मिळण्यासाठीही केंद्राकडून ७ ते ८ महिन्यांचा कालावधी लागत असल्याने या संपूर्ण व्यवस्थेला 'रिबूट' करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.



या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे(Kolhapur-Vaibhavwadi Railway) मार्ग हा गेमचेंजर ठरणार आहे. या ६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पात ५०-५० टक्क्यांच्या भागीदारीनुसार केंद्र सरकार ३ हजार कोटी आणि राज्य सरकार ३ हजार कोटी रुपये देणार आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते याचे भूमिपूजन करून पुढील दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण केला जाईल. सध्या या भागातील वाहतूक गगनबावडा घाटावर आणि रस्ते वाहतुकीवर अवलंबून आहे. हा रेल्वे मार्ग तयार झाल्यावर पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार थेट कोकणाशी जोडला जाईल आणि भविष्यात हीच रेल्वे पुढे रायगड जिल्ह्यातील दिघी बंदरापर्यंत विस्तारित करण्याची सरकारची योजना आहे.


तारापोरवाला मत्स्यालयात 'स्कुबा डायव्हिंग'


- मुंबईचे वैभव असलेल्या आणि सध्या बंद असलेल्या गिरगाव चौपाटीवरील 'तारापोरवाला मत्स्यालया'चा (तारापोरवाला अ‍ॅक्वेरियम) ९०० कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनर्विकास केला जात असल्याची माहिती राणे यांनी दिली. हा प्रकल्प पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर राबवला जात असून, यामध्ये राज्य सरकार ४०० कोटी तर मत्स्यालय क्षेत्रात तज्ज्ञ असलेली खासगी कंपनी ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. सिंगापूर येथील एका नामांकित कन्सल्टन्सीच्या साहाय्याने महाराष्ट्रातीलच एका खासगी कंपनीला याचे व्यवस्थापन दिले जाणार आहे.


- या नवीन आयकॉनिक इमारतीमध्ये मत्स्यव्यवसाय (फिशरीज) विभागाच्या कार्यालयासाठी दोन मजले राखीव असतील. या मत्स्यालयात जगभरातून तब्बल ३८ हजार वेगवेगळ्या प्रजातींचे मासे आणले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या नव्या डिझाईनमध्ये एक अवाढव्य 'सिलेंडर टाईप' अ‍ॅक्वेरियम असेल, ज्याच्या आतमध्ये पर्यटकांना 'स्कुबा डायव्हिंग'चा अनुभव घेता येणार आहे. या वर्षाच्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान या प्रकल्पाचे भूमिपूजन करून २०२८ च्या अखेरपर्यंत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अ‍ॅक्वेरियम मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी दिली.




महाराष्ट्रात 'कॅसिनो' आणणार नाही


मुंबईतील पर्यटन वाढवण्यासाठी नरिमन पॉईंट येथे 'मरीना विथ फ्लोटेक्स' विकसित केले जात असल्याचे राणे यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये मुंबई वॉटर मेट्रोचे एक अत्याधुनिक टर्मिनल असेल, तसेच पर्यटकांसाठी विविध दुकाने आणि इतर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. मात्र, या मरीना प्रकल्पात कोणत्याही प्रकारचा 'कॅसिनो' आणला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. "राज्याच्या प्रमुखांपासून ते माझ्यापर्यंत सरकारमधील कोणाचाही कॅसिनोला पाठिंबा नाही. मुंबईत आजच काय, तर भविष्यात कधीही कॅसिनो येणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.


वॉटर मेट्रोचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत




  • - मुंबई आणि संपूर्ण एमएमआर क्षेत्रातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी २०२८ पासून 'मुंबई वॉटर मेट्रो' प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू केला जाणार आहे. नरिमन पॉईंट ते जुहू, वरळी आणि वर्सोवा हे सर्व प्रमुख टप्पे वॉटर मेट्रोने जोडले जातील. विशेष म्हणजे, मुंबई लोकल, मेट्रो आणि बेस्ट बसच्या तिकीट रचनेतच वॉटर मेट्रोच्या तिकिटाचा समावेश केला जाईल, ज्यामुळे प्रवाशांना एकाच तिकिटावर प्रवास करता येईल.

  • - रेडिओ क्लबजवळ उभारण्यात येत असलेल्या जेटीचे काम पावसाळ्यानंतर वेगाने सुरू होईल आणि ही जेटी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्णपणे तयार होईल. या जेटीवरून प्रवासी अवघ्या १६ मिनिटांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचू शकतील, कारण तिथे वॉटर टॅक्सी टर्मिनल उभारले जात आहे.

  • - हाच वॉटर मेट्रोचा कॉरिडोअर पुढे पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे नियोजित असलेल्या नवीन विमानतळापर्यंत विस्तारित केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वेळेत काम न करणाऱ्या जुन्या कंत्राटदाराला पाठीशी न घालता त्याचे कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून विभागात प्रशासकीय शिस्त आणल्याची माहिती त्यांनी दिली.



कोकणात 'रिव्हर्स मायग्रेशन'साठी नियोजनबद्ध काम


कोकणातील गुणवंत तरुण नोकरी-धंद्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक किंवा गोव्याला जात असल्याने तिथले मनुष्यबळ टिकवून ठेवण्यासाठी आपण 'रिव्हर्स मायग्रेशन'वर भर देत असल्याचे राणे म्हणाले. यासाठी सावंतवाडीमध्ये बोट तयार करण्याचा पहिला मोठा कारखाना घोषित करण्यात आला असून, जहाज बांधणी (शिप-बिल्डिंग) व पर्यटन क्षेत्रातील डिस्नेलँड आणि युनिव्हर्सल स्टुडिओसारखे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी